कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Wednesday, November 2, 2011

कमल देसाई : खोलीभर प्रकाश

- संजय आर्वीकर


(कमलताई गेल्यानंतर 'लोकमत'च्या 'मंथन' ह्या रविवार पुरवणीत आलेला लेख)

१९८१मध्ये मी पहिल्यांदा कमल देसाई यांचे 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' हे पुस्तक वाचलं. पुढे 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' वाचलं. 'रंग' हा त्यांचा पहिला कथासंग्रह मिळवण्यासाठी मी अनेक वाचनालयं धुंडाळली. मग 'रंग २' मात्र सहज मिळालं. मग खूप वर्षं शोधत असलेला खजिना अचानक सापडावा तशा कमलताई 'साक्षात' भेटल्या, त्या २००३मध्ये.
१९९८पासून मी मराठी वाङ्मयाला वेगळं वळण देणाऱ्या लेखकांच्या मुलाखतींच्या एका प्रकल्पावर काम करत होतो यात कमल देसाई यांची मुलाखत असावी अशी माझी फार इच्छा होती. मी संपर्क साधला त्यावेळी त्या, पर्यावरणवादी कार्यकर्त्या वंदना शिवा यांच्या 'स्टोलन हार्वेस्ट' या पुस्तकाचा मराठी अनुवाद करत होत्या. 'तो झाला की मी येते', असं त्या म्हणाल्या.
आपलं गप्पा मारणं - खूप हसणं - सटरफटर खायला आवडणं - टीव्हीवर हिंदी सिनेमा बघणं - जेवणात लोणची अपरिहार्य असणं - अजिंठा वेरूळ बघायला जायचं असणं - सगळं एन्जॉय करणं याबद्दलही त्यांनी पत्रात लिहिलं होतं. स्वतःचं वर्णन लोणची + लेखन = गोष्टीवेल्हाळ म्हातारी कमल देसाई - असं त्यांनी केलं  होतं. या पहिल्याच पत्रभेटीत मैत्रीचं भरघोस आश्वासन होतं. मी तर पत्र वाचता वाचता केव्हाच पोहोचलो होतो, त्यांच्या सांगलीतल्या खोलीत. नंतर मी प्रत्यक्षातही गेलो. मध्यभागी पलंग आणि आजूबाजूला पसरलेली पुस्तकच पुस्तकं.
- आणि मग जुलै २००३मध्ये आम्ही ती बहुचर्चित मुलाखत केली, जी 'पद्मगंधा'च्या २००३च्या दिवाळी अंकात प्रथम प्रकाशित झाली. आणि माझ्या 'नव्या अवकाशातील आनंदायत्रा' या 'पद्मगंधा'नं प्रकाशित केलेल्या पुस्तकातही.
कमलताईंनी प्रथम भेटीतच माझ्यासोबत त्यांच्या खोलीतला आकाशापर्यंत विस्तारलेला बहुरंगी प्रकाश दिला. त्यानंतर आमच्या अनेक प्रत्यक्ष दीर्घ भेटी झाल्या. मुलाखतीच्या काळात आम्ही एकत्र घालवलेले दिवस हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंददायी कालखंड आहे. ते एक अपूर्व सहजीवन होतं; ज्यात माझी पत्नी- मृदुल आणि मुलगी- ऋचा, मुलगा- हृषिकेश हेही सहभागी होते. कमलताई सगळ्या कुटुंबाच्या आणि सगळं कुटुंब कमलताईंचं असं झालं असतानाही एक 'ज्ञानसमृद्ध-ऊर्जा-केंद्र' आपल्या अवतीभवती सतत वावरत आहे असं भान मला येत होतं. चैतन्याचा एक खळाळता स्रोत आपल्याभोवती आहे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.
आठ वर्षांच्या या सहवासात, शहाणं करून सोडणाऱ्या, जीवनावरची श्रद्धा बळकट करणाऱ्या अनेक आठवणींशिवाय कमलताईंनी एक भलं थोरलं बक्षीस मला दिलं. त्यांचा वेचक पुस्तकसंग्रह त्यांनी माझ्या हवाली केली.
पुढं 'काळ्या सूर्याखालच्या गोष्टी' हे 'लोकवाङ्मय गृहा'नं प्रकाशित केलेलं पुस्तक संपादित करताना आम्ही वेळोवेळी केलेल्या संवादाचे प्रतिध्वनी मी ऐकले.
कमलताईंच्या कथा-कादंबऱ्यांमधले संगीताचे संदर्भ जणू सांगीतिक आविष्कार होऊन मला वेढून टाकत. खूप वर्षांपूर्वी मी नागपूरला असताना एक प्रदीर्घ आजारपण भोगलं होतं. त्या घनघोर अंधारातून बाहेर येताना, त्यांच्या काही पात्रांभोवती आभा मला खुणावत असे. ही आभाच त्यांच्या खोलीतल्या प्रकाशाकडे नेणारी ठरली.
निर्मिती, शोध आणि खेळ या तीनही प्रेरणा त्यांच्या लेखनात एकवटल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही निर्माता, लहान मूल आणि तत्त्वज्ञ हे पैलू एकत्रित होते. साध्या लौकिक गोष्टींबद्दल बोलता बोलता एकदम तत्त्वज्ञानाकडे झेपावत, साध्या खेळाचे वैश्विक खेळात रूपांतर करणे याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. त्यांची प्रतिभा काळाचे अगदी सहजपणे खेळणे करते.
त्यांची कथा-कादंबरी तुलनेनं पुढच्या काळाची होती असं म्हणणं अर्धसत्य ठरेल कारण कालजयी होण्याचं सामार्थ्य त्यात आहे. विस्कटलेल्या कुटुंबाचं चित्रण करणाऱ्या त्यांच्या कुटुंबकथा अंतिमतः विस्कटलेल्या विश्वाच्या पसाऱ्याचं लघुरूप उभं करतात. प्रस्थापित मूल्यव्यवस्थेची चौकट खिळखिळी होईल, इतके मूलगामी प्रश्न त्या उपस्थित करतात. त्यांची जीवनदृष्टी मानवी अस्तित्वासह साऱ्या सृष्टीला गवसणी घालणारी आहे.
कुठल्याही वयाच्या माणसाशी मैत्री होणं हे कमलताईंचं खास वैशिष्ट्यं होतं. स्वतःकडचं भरभरून देतानाच दुसऱ्याकडे काही वेगळं आहे असं जाणवलं तर ते मागे लागून त्याच्याकडून समजून घेणं हा त्यांचा ध्यास असे. मी 'गांधी' चित्रपटावर लिहिलेला एक लेख 'मला तुझ्या संगतीत पुन्हा एकदा 'गांधी' बघायचा आहे', असं त्या वारंवार म्हणायच्या.
अगदी अलीकडे आम्ही गेल्या मे महिन्यात कमलताईंच्या साहित्याची एक अभ्यासक डॉ. प्रिया जामकर हिच्याकडे दोन-तीन दिवस एकत्र राहिलो. 'रंग' या कथेवर चित्रपट करावा असं प्रिया आणि हृषिकेश या दोघांचंही स्वप्न आहे. याबद्दलच्या चर्चेत, अगदी खेळात सामील होत असल्यासारख्या त्या सहभागी झाल्या आणि एका क्षणी म्हणाल्या, 'बाकी सगळं ठरलं असेल तर तुमच्या सिनेमात मी काय करणार, ते मी सांगते. मी या सिनेमाला संगीत देणार.' त्यांची ही घोषणा 'हॅट घालणाऱ्या बाई'मधील नायिकेला शोभणारी होती. मी नेहमी गंमतीनं त्यांना म्हणायचो, 'ब्याऐंशीव्या वर्षी चित्रपटात काम करायला तुम्ही सुरुवात केली, आता शंभरीपर्यंत पुढची अठरा वर्षांची देदीप्यमान चित्रपट-कारकीर्द तुमच्यापुढे आहे. मेमध्येच त्यांचा आणखी एकदा अचानक फोन आला. त्या म्हणाल्या, 'काही नाही, खूप दिवसात तुझा आवाज ऐकला नाही म्हणून खरं तर फोन केलाय. आणखी एक- मला दोन नव्या गोष्टी सुचल्यात. माझ्या लक्षात राहतील न राहतील, लिहिणं होईल न होईल.'
आणि नंतर आता अगदी अलीकडचा जूनमधला एक दिवस. 'कमलताईंना सांगलीत 'आयसीयू'त ठेवलंय' असं सांगणारा प्रियाचा फोन आला. आम्ही तिकडे जाण्यासाठी तयारी करतो तोच त्यांची प्रकृती आठवडाभरात स्थिरावेल असं सांगणारा निरोप सांगलीहून मिळाला. आणि लगेच १६ जूनला उशिरा रात्री त्या गंभीर असल्याचं कळलं. १७ जूनला सकाळी सांगलीच्या वाटेवर निघालो असताना कमलताई 'गेल्याचा' निरोप मिळाला. आम्ही निघालो होतोच. त्यांचं अंत्यदर्शनही होणार नाही हेही स्पष्ट होतं; पण मीच मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की त्यांचं अंत्यदर्शन मला घडू नये. ते ऊर्जा-केंद्र माझ्या मनात सळसळत- दृश्य रूपात तसंच राहावं असं मला वाटत होतं.
मी रात्री दहाच्या सुमारास सांगलीला पोहोचलो. त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. पण मला सारखी खुणावत होती ती त्यांची खोली. मी आणि मृदुल कमलताईंचे भाचे दिलीप देसाई आणि शिरीष जोशी यांच्यासह कमलताईंच्या खोलीत गेलो. माझ्या मनात दाटल्या होत्या आठवणी - २००३ साली मी प्रथम त्यांना भेटलो तेव्हाच्या. माझ्यासमोर एका कंदिलाकडे बघून, 'अरे, तू इथं कसा? असं कंदिलाशी बोलणाऱ्या कमलताई मी इथेच पाहिल्या होत्या. सत्यशोधाच्या वाटेवर साऱ्या सृष्टीशी जोडून घेणारे कमल देसाई नावाचे चैतन्य मी सदेह रूपात इथंच प्रथम अनुभवले होते.
...मी वाकून खोलीलाच नमस्कार केला. मला दिसत  होत्या त्या आरामखुर्चीत बसलेल्या आणि मला सांगतायेत, 'माझी परमेश्वराची कल्पना वेगळी आहे. मी खरं तर धर्मबिर्म न मानणारी बाई आहे. तोकसा आहे, तो माझ्याजवळच आहे. म्हणजे माझ्या खोलीभर आनंद आहे. माझ्याकडून जाणाऱ्या माणसाला मी म्हणते, 'खोली भरून आनंद घेऊन जा.'
कमलताई, तुम्ही हे सांगितलं तेव्हापासून मी अनेक गोष्टी तुमच्या 'खोली'च्या प्रकाशातच बघतो आहे!
गांधी गेले तेव्हा विनोबा म्हणाले होते, 'बापू देहात होते तोपर्यंत त्यांना भेटण्यासाठी जाण्याला काहीतरी वेळ लागत असे. पण आतातर त्यांना भेटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही. डोळे बंद केले की भेट झालीच.'
माझ्यासाठीही तुमचं 'असणं' तसंच आहे. डोळे बंद केले की तुमची भेट.
एकदा माझ्या संगतीनं तुम्हाला 'गांधी' चित्रपट बघायचा होता.
फक्त तेवढ्यासाठी फिरून यालं कमलताई? तेव्हा मात्र माझे डोळे उघडे असतील, सतत झरणारे...

No comments:

Post a Comment