कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)
Showing posts with label maharashtra times. Show all posts
Showing posts with label maharashtra times. Show all posts

Tuesday, November 8, 2011

मजकूर

कमल देसाईंच्या निधनानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये  १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झालेला मजकूर-

कमल देसाई यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एका फॅण्टसीलाच पूर्णविराम मिळाला आहे. 'रंग-१' आणि 'रंग-२' हे दोन कथासंग्रह, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी आणि 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' ही जोड कादंबरी एवढंच मोजकं लिहूनही कमल देसाई मराठी साहित्याच्या विश्वात अजरामर झाल्या. विशेषत: 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' प्रसिद्ध झाल्यावर कमल देसाई साहित्यातील फॅण्टसीची एक जितीजागती मिसाल बनल्या. स्त्रियांकडे कल्पकतेचा अभाव असतो, असा आरोप लेखिकांवर कायम केला जातो. पण कमल देसाई आणि त्यांचं साहित्य म्हणजे या आरोपाला एक सणसणीत उत्तर आहे. मात्र केवळ त्यांचं साहित्यच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही एखाद्या फॅण्टसीसारखं होतं. त्यांच्या आयुष्याचा आलेख पाहिला की, त्याचं पुरेपूर प्रत्यंतर येतं. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचा. मिरजेत त्यांचं वडिलोपार्जित घर होतं आणि त्यांचं बालपण व सुरुवातीचं शिक्षणही तिथेच झालं. पुढे एम.ए.च्या शिक्षणासाठी त्या मुंबईत होत्या. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या कथा 'सत्यकथे'त छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठीचं अध्यापन केलं, पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत आणि याचं मूळ त्यांच्या मनस्वी स्वभावात होतं. क्षणात शांत, क्षणात अशांत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. पण यातून त्यांचं सर्जनशील लेखन मात्र झालं. वाचकांशी-समाजाशी फार संपर्क नसल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व साऱ्यांसाठी नेहमीच काहीसं गूढ होतं. मात्र लोकांत मिसळल्या नाही, तरी बौध्दिक-वैचारिक पातळीवर त्यांचा सतत अनेकांशी संवाद सुरू असायचा. यातूनच दुर्गा भागवत, अशोक शहाणे, 'नवी क्षितिजे'कार विश्वास पाटील, जया दडकर, समीक्षक रा. भा. पाटणकर अशांशी त्यांची मैत्री जमली होती आणि या सगळ्यांशी त्यांच्या साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद, मिथक या विषयांसंदर्भात गप्पा होत. या गप्पांतून मिळालेल्या प्रेरणांतूनच त्यांनी बर्नर्ड बोझांकिटच्या 'थ्री लेक्चर्स ऑन एस्थेटिक' या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. अलीकडेच प्रकाशित झालेल्या किरण नगरकर यांच्या 'द ककल्ड' (मराठी अनुवाद-प्रतिस्पर्धी) या कादंबरीला त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही त्यांच्या विचक्षण बुद्धिमत्तेची साक्ष देण्यास पुरेशी होती. त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकार पॉल गोगॅच्या 'ओल्ड गोल्ड ऑन देअर बॉडी' या पुस्तकाच्या प्रभाकर कोलते यांनी केलेल्या अनुवादालाही त्यांनी नुकतीच प्रस्तावना दिली होती आणि ती प्रस्तावनाही त्यांना एकूणच कलेविषयी असलेली जाण अधोरेखित करणारी आहे.

Sunday, November 6, 2011

कमल देसाई

कमलताईंना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १ ऑक्टोबर २००४ रोजी प्रकाशित झालेला मजकूर -


बख्खळ पुरस्कारांच्या आजच्या जमान्यातही काही पुरस्कार आपला मान राखून असतात आणि काही काही पुरस्कारविजेते असेही असतात की , ज्यांना तो पुरस्कार मिळाल्याने त्या पुरस्काराचाच सन्मान होत असतो!

चोखंदळ साहित्यिका कमल देसाई यांना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्याचे ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांची हीच भावना झाली; कारण, मोजकेच पण जीवनाचा वेगळाच अर्थ जाणवून देणारे प्रत्ययकारी लेखन करणारी लेखिका म्हणून या ७६ वर्षांच्या लेखिकेने मराठी सारस्वतात स्वत:चे असे एक खास स्थान निर्माण केले आहे.

१० नोव्हेंबर १९२८ रोजी बेळगावजवळच्या यमकनमडी गावी जन्मलेल्या कमल देसाईंनी उभारीची वर्षे अहमदाबाद. धुळे , निपाणी , कागल आदी ठिकठिकाणी मराठीचे अध्यापन करण्यात घालवली. त्यामुळे सत्यकथा , मौज आदी दर्जेदार नियतकालिकांतून मोजकेच लेखन करण्याकडे त्यांचा कल होता.

१९६२ साली ' रंग-एक ' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ' रंग- २' निघायला १९९८ साल उजाडावे लागले , इतका त्यांचा कथालेखनाचा वेग धीमा होता. दरम्यान १९६४ साली ' रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंतर 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९८३ साली 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' हे अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले.

बस्स! एवढेच साहित्य नावावर असतानाही, डॉ. रा. भा. पाटणकर यांच्यासारख्या मर्मग्राही समीक्षकाला १९९४ साली 'कमल देसाई यांचे कथाविश्व' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित करून कमल देसाईंच्या कथालेखनाच्या बलस्थानांचा धांडोळा घ्यावासा वाटला, हे विशेष! कमल देसाई यांचा ' रंग-दोन ' हा कथासंग्रह लेखिकेला अभिप्रेत असलेले सामाजिक, राजकीय भाष्य अधिक नेमकेपणी अधोरेखित करणारा आहे. त्यांचे साहित्य या जगाचे व त्यातील अनेक पातळ्यांवरील अनाकलनीय मानवी व्यवहारांचे ताणतणाव; सभोवतालचे वास्तव व अंतर्मन यांत अविरत सुरू असलेले द्वंद्व; मानवी जगात मोठ्या प्रमाणात आढळणारी हिंसा व वेदना- या साऱ्याचे आगळेवेगळे आकलन वाचकांना घडवते. संज्ञाप्रवाही लेखनशैलीमुळे बाह्य वास्तवाच्या चित्रणापेक्षा , त्या वास्तवाच्या अनेकपदरी प्रतिक्रिया उमटवणारे मनोविश्लेषणात्मक लेखन त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची व सघन पोत देऊन जाते. गोष्ट सांगणे, कथाभाग पुढे सरकावणे, पात्रे/प्रसंग/वातावरणनिर्मिती इत्यादी घटकतत्त्वांना कमल देसाईंमधील कथाकार/ कादंबरीकाराने ताकदीने नवी परिमाणे दिली. वाट्याला आलेले बरेवाईट आयुष्य जगत असताना माणसांना क्षणोक्षणी पडणारे नैतिक/मनोवैज्ञानिक/ आदिभौतिक प्रश्न ही साहित्यिका आपल्या कसदार साहित्यातून समर्थपणे हाताळते. त्यामुळेच त्यांचे लेखन एक वेगळीच उंची गाठते. कमल देसाई यांचे हार्दिक अभिनंदन!