कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Tuesday, November 8, 2011

बातमी

कमल देसाई १७ जून २०११ रोजी गेल्या. तेव्हा 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध झालेली ही बातमी.  फक्त संदर्भासाठीच--
(निधनाच्या बातमीचा संदर्भच सुरुवातीला काहींना कदाचित पटणार नाही, पण काय करणार?)

----------
प्रयोगशील लेखिका कमल देसाई यांचे निधन

सांगली- आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या लेखिका कमल देसाई यांचे आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मेंदूज्वरामुळे त्या आजारी होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता. गेल्या गुरुवारी सांगलीत 'न्यू प्राईड मल्टीप्लेक्‍स'मध्ये त्यांनी मित्रांसोबत 'बालगंधर्व' चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी गांधर्वयुगावर दिलखुलास चर्चा केली होती.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तियांनी सांगितले.

कमलताईंचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. प्राथमिक माध्यमिक शिक्षण धारवाडमध्ये झाले. इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते. तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एमए केले. पदवीनंतर त्यांनी अहमदाबाद, धुळे, भिवंडी, मिरज, कागल येथे दीर्घ काळ मराठीचे अध्यापन केले. सौंदर्यशास्त्र आणि मराठी साहित्य हे त्यांचे आवडीचे विषय होते.

साठ-सत्तरच्या दशकांमध्ये 'सत्यकथा' मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईंची गणना होते. प्रतिके आणि प्रतिमांची अर्थवाही लेखनशैली त्यांचे वेगळेपण दाखवणारी ठरली.पॉप्युलर प्रकाशनाने कमलताईंचा 'रंग-१' हा कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहातील 'तिळा बंद' कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली. त्यानंतरच्या विविध नियतकालिकांतील त्यांच्या कथा 'रंग २' नावाने प्रसिध्द झाल्या. 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' ही कादंबरी, 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. गेल्या वर्षी सुमित्रा भावे यांच्या 'एक कप च्या' या चित्रपटातही त्यांनी काम केले. वंदना शिवा यांच्या 'स्टोलन हार्वेस्ट' या ग्रंथाचे 'लुबाडलेले शेत' नावाने तर बर्नर्ड बोंझाकिट यांच्या 'थ्री लेक्‍चर्स ऑन ऍस्थेटिक्स' या पुस्तकाचा 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' या नावाने अनुवाद केला.

मजकूर

कमल देसाईंच्या निधनानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये  १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झालेला मजकूर-

कमल देसाई यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एका फॅण्टसीलाच पूर्णविराम मिळाला आहे. 'रंग-१' आणि 'रंग-२' हे दोन कथासंग्रह, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी आणि 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' ही जोड कादंबरी एवढंच मोजकं लिहूनही कमल देसाई मराठी साहित्याच्या विश्वात अजरामर झाल्या. विशेषत: 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' प्रसिद्ध झाल्यावर कमल देसाई साहित्यातील फॅण्टसीची एक जितीजागती मिसाल बनल्या. स्त्रियांकडे कल्पकतेचा अभाव असतो, असा आरोप लेखिकांवर कायम केला जातो. पण कमल देसाई आणि त्यांचं साहित्य म्हणजे या आरोपाला एक सणसणीत उत्तर आहे. मात्र केवळ त्यांचं साहित्यच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही एखाद्या फॅण्टसीसारखं होतं. त्यांच्या आयुष्याचा आलेख पाहिला की, त्याचं पुरेपूर प्रत्यंतर येतं. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचा. मिरजेत त्यांचं वडिलोपार्जित घर होतं आणि त्यांचं बालपण व सुरुवातीचं शिक्षणही तिथेच झालं. पुढे एम.ए.च्या शिक्षणासाठी त्या मुंबईत होत्या. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या कथा 'सत्यकथे'त छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठीचं अध्यापन केलं, पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत आणि याचं मूळ त्यांच्या मनस्वी स्वभावात होतं. क्षणात शांत, क्षणात अशांत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. पण यातून त्यांचं सर्जनशील लेखन मात्र झालं. वाचकांशी-समाजाशी फार संपर्क नसल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व साऱ्यांसाठी नेहमीच काहीसं गूढ होतं. मात्र लोकांत मिसळल्या नाही, तरी बौध्दिक-वैचारिक पातळीवर त्यांचा सतत अनेकांशी संवाद सुरू असायचा. यातूनच दुर्गा भागवत, अशोक शहाणे, 'नवी क्षितिजे'कार विश्वास पाटील, जया दडकर, समीक्षक रा. भा. पाटणकर अशांशी त्यांची मैत्री जमली होती आणि या सगळ्यांशी त्यांच्या साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद, मिथक या विषयांसंदर्भात गप्पा होत. या गप्पांतून मिळालेल्या प्रेरणांतूनच त्यांनी बर्नर्ड बोझांकिटच्या 'थ्री लेक्चर्स ऑन एस्थेटिक' या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. अलीकडेच प्रकाशित झालेल्या किरण नगरकर यांच्या 'द ककल्ड' (मराठी अनुवाद-प्रतिस्पर्धी) या कादंबरीला त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही त्यांच्या विचक्षण बुद्धिमत्तेची साक्ष देण्यास पुरेशी होती. त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकार पॉल गोगॅच्या 'ओल्ड गोल्ड ऑन देअर बॉडी' या पुस्तकाच्या प्रभाकर कोलते यांनी केलेल्या अनुवादालाही त्यांनी नुकतीच प्रस्तावना दिली होती आणि ती प्रस्तावनाही त्यांना एकूणच कलेविषयी असलेली जाण अधोरेखित करणारी आहे.

Monday, November 7, 2011

मिसफिट

- अशोक शहाणे

(कमलताई गेल्यानंतर 'प्रहार'च्या १८ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला मजकूर. मजकुराचं सगळं श्रेय शहाणे, प्रहार, या पानासाठी काम केलेले संपादक इत्यादींना आहे. लेख इथं प्रसिद्ध करण्यासाठी शहाण्यांची परवानगी घेतली आहे. 'प्रहार' शब्दावर क्लिक केल्यावर मूळ पान पाहाता येईल. मूळ प्रसिद्ध झालेल्या मजकुरात तपशिलांच्या दोन चुका होत्या त्या इथं दुरुस्त केल्या आहेत.)

कमल देसाई यांचं खरं तर दुर्दैव असं की, त्यांचं लिखाण समजून घेऊ शकणारे वाचक त्यांना कधीच मिळाले नाहीत. ही त्यांची लेखक म्हणून खंत होती. पण या गोष्टीला इलाज नव्हता. हे नेहमीच असतं. आपण काय लिहितो, ते समजून घेणारा वाचक असेल का, याचा उपाय लेखकाकडे असत नाही. म्हणून ते आपलं समजणारा वाचक कधीतरी निघेल, या भरवशावर लिहीत राहतात. यामुळेच कमल देसाई बऱ्याच दिवसांपासून काही लिहीत नव्हत्या.
आपल्याकडे संवादाचाही मोठा प्रश्न असतो. बाई विद्यापीठात शिकवायच्या. पण तिथेही त्यांना असा अनुभव आला की, आपण जे सांगतो आहोत ते लोकांना ऐकायचंच नाही. मग वेळ घालवून, शिरा ताणून कशाला घ्या. म्हणून त्यांनी विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सांगायचं म्हणजे बाई कशातच बसत नव्हत्या. जिकडे जावं तिकडे आपण मिसफिट आहोत, याची त्यांना कधीकधी खंत वाटायची. लिहिणं सोडा, पण उपजीविकेच्या बाबतीत असं व्हायला लागलं तर काय? त्यामुळे बाई अलीकडे हल्लक झाल्या होत्या. मध्यंतरी त्या काही काळ पुण्यात राहात होत्या. पण ज्यांच्याशी बोलावं अशी माणसं पुण्यात नव्हती. त्यातच त्यांची बालमैत्रीण सुधा (नावकल) मागच्याच वर्षी गेली. त्यानंतर त्या एकटय़ा पडल्या.
मी पुण्यात जायचो तेव्हा त्यांना नेहमी भेटायला जायचो. दोन-तीन महिन्यांपूर्वी गेलो होतो, तेव्हाही त्यांना भेटलो. पण त्या वेळी त्यांच्या भाचेसुनेनं सांगितलं की, 'तुम्ही आता जा. कारण तुम्ही आलात की, त्या बोलायला लागतात आणि मग नंतर त्यांना त्रास होतो.' त्यानंतर मात्र त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. माझ्याविषयी त्यांनी काही वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, तो 'ऑफ द कफ' होता. आमचे संबंध एकमेकांविषयी लेख लिहिण्यापुरते कधीच नव्हते.
दहा वर्षापूर्वी बाईंच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा सांगलीत सत्कार करण्यात आला. मुंबईहून मी आणि रघू दंडवते त्याला गेलो होतो. तिथे बरेच लोक त्यांच्याबद्दल काय काय बोलले. मग त्यांना बोलण्याचा आग्रह करण्यात आला, तर त्या म्हणाल्या, 'मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही बोललात तेच फार झालं.' पण त्यामुळे आयोजक नाराज झाले. त्यांनी बाईंनी बोलावं म्हणून पुन्हा आग्रह केला. तेव्हा त्या म्हणाल्या, 'माझे दोन मित्र मुंबईहून आले आहेत. त्यामुळे मला न बोलण्याचं बळ मिळालं आहे.' त्यांच्या अशा वागण्यानं सगळ्यांचा विरस झाला. पण मला आश्चर्य वाटतं होतं की, त्यांनी हा समारंभ होऊच कसा दिला? त्यावर त्या म्हणाल्या, 'समारंभ झाला काय अन् न झाला काय, त्यानं काही फरक पडत नाही. शिवाय 'नाही' म्हटलं की त्यासाठी जोर लावावा लागतो. त्यापेक्षा करतात तर करू द्या.' म्हणजे बाई म्हटलं तर त्यात होत्या, म्हटलं तर नव्हत्या.
बाई तसं गंमतीशीर प्रकरण होतं. अशी माणसं क्वचितच असतात. ती मुद्दामून शोधावी लागतात. आणि असली तरी आपली आणि त्यांची गाठ पडत नाही. अशी माणसं आता एकेक करून चालली आहेत. पण त्यांची जागा घेणारं कुणी दिसत नाही.

Sunday, November 6, 2011

कमल देसाई

कमलताईंना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १ ऑक्टोबर २००४ रोजी प्रकाशित झालेला मजकूर -


बख्खळ पुरस्कारांच्या आजच्या जमान्यातही काही पुरस्कार आपला मान राखून असतात आणि काही काही पुरस्कारविजेते असेही असतात की , ज्यांना तो पुरस्कार मिळाल्याने त्या पुरस्काराचाच सन्मान होत असतो!

चोखंदळ साहित्यिका कमल देसाई यांना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्याचे ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांची हीच भावना झाली; कारण, मोजकेच पण जीवनाचा वेगळाच अर्थ जाणवून देणारे प्रत्ययकारी लेखन करणारी लेखिका म्हणून या ७६ वर्षांच्या लेखिकेने मराठी सारस्वतात स्वत:चे असे एक खास स्थान निर्माण केले आहे.

१० नोव्हेंबर १९२८ रोजी बेळगावजवळच्या यमकनमडी गावी जन्मलेल्या कमल देसाईंनी उभारीची वर्षे अहमदाबाद. धुळे , निपाणी , कागल आदी ठिकठिकाणी मराठीचे अध्यापन करण्यात घालवली. त्यामुळे सत्यकथा , मौज आदी दर्जेदार नियतकालिकांतून मोजकेच लेखन करण्याकडे त्यांचा कल होता.

१९६२ साली ' रंग-एक ' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ' रंग- २' निघायला १९९८ साल उजाडावे लागले , इतका त्यांचा कथालेखनाचा वेग धीमा होता. दरम्यान १९६४ साली ' रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंतर 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९८३ साली 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' हे अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले.

बस्स! एवढेच साहित्य नावावर असतानाही, डॉ. रा. भा. पाटणकर यांच्यासारख्या मर्मग्राही समीक्षकाला १९९४ साली 'कमल देसाई यांचे कथाविश्व' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित करून कमल देसाईंच्या कथालेखनाच्या बलस्थानांचा धांडोळा घ्यावासा वाटला, हे विशेष! कमल देसाई यांचा ' रंग-दोन ' हा कथासंग्रह लेखिकेला अभिप्रेत असलेले सामाजिक, राजकीय भाष्य अधिक नेमकेपणी अधोरेखित करणारा आहे. त्यांचे साहित्य या जगाचे व त्यातील अनेक पातळ्यांवरील अनाकलनीय मानवी व्यवहारांचे ताणतणाव; सभोवतालचे वास्तव व अंतर्मन यांत अविरत सुरू असलेले द्वंद्व; मानवी जगात मोठ्या प्रमाणात आढळणारी हिंसा व वेदना- या साऱ्याचे आगळेवेगळे आकलन वाचकांना घडवते. संज्ञाप्रवाही लेखनशैलीमुळे बाह्य वास्तवाच्या चित्रणापेक्षा , त्या वास्तवाच्या अनेकपदरी प्रतिक्रिया उमटवणारे मनोविश्लेषणात्मक लेखन त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची व सघन पोत देऊन जाते. गोष्ट सांगणे, कथाभाग पुढे सरकावणे, पात्रे/प्रसंग/वातावरणनिर्मिती इत्यादी घटकतत्त्वांना कमल देसाईंमधील कथाकार/ कादंबरीकाराने ताकदीने नवी परिमाणे दिली. वाट्याला आलेले बरेवाईट आयुष्य जगत असताना माणसांना क्षणोक्षणी पडणारे नैतिक/मनोवैज्ञानिक/ आदिभौतिक प्रश्न ही साहित्यिका आपल्या कसदार साहित्यातून समर्थपणे हाताळते. त्यामुळेच त्यांचे लेखन एक वेगळीच उंची गाठते. कमल देसाई यांचे हार्दिक अभिनंदन!

Saturday, November 5, 2011

'एक कप च्या'मध्ये

'एक कप च्या' ह्या सुमित्रा भावे नि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात कमल देसाई (मागच्या बाजूला)

Friday, November 4, 2011

एक सदेह फॅण्टसी

- दुर्गा भागवत

कमल देसाईला मी 'कमळी' म्हणते. माझी म्हटलेली जी काही मोजकी माणसं आहेत त्यात कमळी येते. या माणसांशी बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी असे कुठलेही संबंध मी प्रस्थापित केलेले नाहीत. साधी कौटुंबिक नातीच सांभाळत सांभाळता नाकीनऊ येतात माणसाच्या, तिथे बनावटीची नाती कुठे जोडायला जा? पण विशेष असा की, ही एकच वल्ली अशी आहे की मी तिला मेले, कार्टे, गधडी, शिंची अशा शेलक्या विशेषणांनी कुठेही, कुणापुढेही संबोधते. तीदेखील ती सारी बिरुदे खुशीत येऊन स्वीकारते. असा हा आमचा ऋणानुबंध.

कमळीला मी 'सदेह फॅण्टसी' म्हणते, ('फॅण्टसी'चे मराठी रूपांतर मी 'भ्रान्तिका' असे केले आहे) साध्या गोष्टी - पण पुढे कथा आणि नवकथा या नावाने प्रसिद्ध झालेला प्रकार - लिहिणारी कमळी पुढे अक्षरश: भ्रान्तिका लिहिता लिहिता स्वत:च फॅण्टसी कशी बनून गेली याचा हा आलेख आहे.

'सत्यकथे'त १९४९ साली तिची 'बाई सर्व्या घंटा झाल्या' ही कथा मी वाचली. तेव्हा ती इतर कथांसारखी असली तरी ताजी कथा होती. मला ती फार आवडली, नव्हे तिने माझ्या मनात घर केले. त्याला वर्ष उलटले. १९५० साली मी कशासाठी तरी गावदेवीला लॅबर्नम रोडवरच्या आर्य-महिला समाजाच्या लेडीज हॉस्टेलवर गेले होते. तिथे एम. ए. करीत असलेल्या तीन पोरी मला भेटल्या. हे त्रिकूट इंदू खाड्ये, सुधा कुलकर्णी (नंतर नावकल) आणि कमल देसाई यांचे. हे त्रिदल तेव्हापासून माझ्या नजीकच्या जगात वावरते आहे. कमल देसाई हे नाव ऐकल्यावर मी विचारले, 'बाई सर्व्या घंटा' ही गोष्ट तूच लिहिलीस का? ती हो म्हणाली आणि या तिघींशी माझी गट्टी जमली. इंदू अविवाहित असून बरीच वर्षं रिझर्व्ह बँकेत संशोधन विभागात काम करून निवृत्त होऊन पुण्याला गेली. सुधा लग्न करून नावकल बनली. नावकल कुटुंबाशी माझा अतूट स्नेह निरंतर आहे. तसाच स्नेह समस्त देसाई परिवाराशी आहे. कमळीबाई सर्व्या ढंगाच्या नि तरीसुद्धा थोडा सूर पालटणाऱ्या कथा लिहितच राहिली. त्या कथांचा संग्रह 'रंग' या नावाने 'पॉप्युलर'ने १९६७ साली प्रसिद्ध केला.

'रंग'नंतर तिच्या कथा फॅण्टसीच्या अंगाने आकार घेऊ लागल्या. तिची 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही पहिली कादंबरी १९६४मध्ये प्रसिद्ध झाली. 'रंग' ते 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' हा तिच्या लेखनाचा सुटा व प्रारंभिक टप्पा आहे. 'रंग'मध्ये 'बाई सर्व्या...' ही कथा आहेच. 'बाई सर्व्या घंटा झाल्या' या कथेत लेखिकेने जणू आपल्या आयुष्यभरच्या अस्थिर व्यावसायिक जीवनाची-भविष्यातली कुंडलीच मांडली आहे. कमळीच्या किती नोकऱ्या झाल्या नि ती कुठेच स्थायिक झाली नाही. उत्तम शिक्षिका, शीलवती आणि वक्तृत्वसंपन्न असून हे कसे हे साऱ्यांनाच एक कोडे पडते. विशेष करून माझे जीवनही तसेच अस्थिर असून मीही त्याबद्दल अचंबा करीत राहते.

१९६४नंतर कमळी सतत लिहितच राहिली ती थेट १९८८पर्यंत. पण या काळी तिची वाङ्मयीन घडण बदलली. साफ बदलली. तिच्या 'सत्यकथे'च्या दिवाळी अंकातल्या दोन कादंबऱ्या (की कथा?) 'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' या १९७५ साली मौज प्रकाशनाने काढल्या. एकाच 'पुस्तका'त काढल्या. त्याची दुसरी आवृत्ती अजून निघाली नाही. कमळीतल्या फॅण्टसीने इथून आपला स्वत:चा आकार घेतला. त्या कादंबऱ्याही छोट्याच आहेत. या कादंबऱ्यांनी साहित्यिकांच्या श्रेष्ठ श्रेणीत तिला नेऊन बसवले. ध्रुवासारखे अढळ स्थान तिला प्राप्त करून दिले. कमळीसारखी फॅण्टसी मराठीत अजून कुणाला जमलेली नाही. कमळी फॅण्टसीत का शिरली? नियतीचे क्रूर प्राबल्य, मानवाचा पराभव यांच्या तीव्र जाणिवेने भरलेला आहे. तिची मानवी व्यवहाराची निरीक्षणे खोल व सुजाण आहेत आणि ती व्यक्त करण्याची तिची पद्धत पण अप्रूप आहे. हे कमळीकडे कसे आले?

कमळीच्या आयुष्यातले स्थूल तपशील मला माहीत आहेत. माझ्या मते हे वाङ्मयीन परिवर्तन घडवून आणणारा प्रसंग म्हणजे तिच्यापेक्षा थोरली अशी तिची सुविद्य आणि अतिशय कुशल, बुद्धिमान बहीण शांती हिचा १९७० साली घडलेला मृत्यू असावा. तेव्हापासून नियतीच्या क्रौर्याचे भान तिच्यात सतत चाळवत असल्याचे मला आढळले आहे. दुसऱ्याही अनेक प्रसंगांतून-तेही माणसा-माणसांतल्या प्रथम सलगीनंतर कायम दुरावा अशा प्रसंगातून उद्भवलेले. हे अनुभव साऱ्यांनाच कमी-अधिक प्रसंगात येतात. पण दुसरी माणसे सुखाचा शोध घेतात, लौकिक महत्त्वाकांक्षेचा मागे लागतात नि जगाच्या दृष्टीने 'सुखी' होतात तसे कमळीचे नाही. सुख म्हणजे काय हे तिला नीट कळते. दुसऱ्याच्या सुखाने ती खरोखर सुखावते. पण लगेच हा मूड बदलतो. ती परत स्वत:च्या आत स्वत:ला दडवते. बालपणी प्रत्येक बालकाच्या मनात असलेल्या भयाचा बागुलबोवा कमळीने फॅण्टसीच्या अतुलनीय शक्तीने आपला कायम सोबती केला आहे. बाकीचे तुम्ही आम्ही सारे औट घटकेपुरते तिचे सोबती असतो. तिचे सारे वागणेच 'विचित्र' असते. स्वत:बद्दल शंकित ती आम्हा साऱ्यांच्या सोबतीत असते, तेव्हा ती कुठेतरी किंचित विश्रब्ध पण असते. तिचे वागणे समोर असताना आनंदी दिसते न दिसते तोच ती 'आत' बुडते. 'आत बुडण्याची' तिची कला अजब आहे. इतकी की, ती कुठे गडप झालीय हे बघण्यासाठी बापू देसाई तिच्या बिऱ्हाडी येतात, तर कमळी अंधार करून स्वत:च्या एका खोलीच्या घरात पलंगावर उशी डोकीवर घेऊन पडलेली असते. हा तिचा शिरस्ता साऱ्यांनाच माहीत आहे.

'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' यांच्यावर आमचे जया दडकर इतके खूश आहेत की, विचारू नका. ते म्हणतात, 'मराठीतले खरे कथाकार तीनच. जी. ए., कमल देसाई आणि चि. त्र्यं. खानोलकर. भलतीच ताकदीची बाई.' अशोक शहाणे तिच्या कथांना 'विक्षिप्त कथा' असे मोठ्या अभिमानाने म्हणतो.

आता याच दोन कथांच्या संदर्भात मला दिसलेले मानसचित्र असे - एक पॅरॉनॉइड म्हणजे स्थिरभ्रम वृत्तीचे दर्शन. दोन्ही कथांत - कादंबऱ्यांत मुख्य पात्र स्त्रीच आहे हे विशेष. पॅरॉनॉइड वृत्तीची ती नायिका सबंध गावात नाशाला कारणीभूत झालेले सुंदर शिल्पाकृती असलेलं काळ्या सूर्याचे मंदिर स्फोट करून त्यात आपला बळी देते. हॅट घातलेली बाईदेखील स्टुडिओला आग लावते. या दोन्ही कथांतले चित्रण मॅसोचिस्ट आत्मपीडक वृत्तीने अतोनात भरलेले आहे. शिवाय कमळीतदेखील ही वृत्ती अशी दिसते की, तिला जर कुणी त्रास दिला नाही तर बरेच वाटत नाही. नातेवाईकांची दारुण दु:खे त्यांच्याहून अधिक सोसण्यात तिला 'सुख' वाटते हे मीही पाहिले आहे. ती दु:खे खरेच दारुण आहेत यात शंका नाही. पण सामान्य माणूस त्यांच्यातून मनाने तरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो, तर कमळी त्यांना गच्च कवळून धरते. तरी कमळी ही व्यक्ती म्हणून साऱ्यांनाच आवडते.

कमला दास आणि अमृता प्रीतमपेक्षा कमळी कितीतरी सरस आहे. कमळीचे लेखन कुणाच्या लेखनाबरहुकूम बेतलेले नाही. पाश्चात्य वाङ्मयाची जाण असून त्याचा आधार तिने घेतलेला नाही.

Thursday, November 3, 2011

कमलताई


- अनिल अवचट

कमल देसाई
परवा मोबाइल वाजला आणि नाव बघतो, तर काय? कमळी? म्हणजे? कमळी जिवंत आहे की काय? जगाला असा गुंगारा दिला होय?
पण फोनवर होती कमलताईंची सून. नंदू. कमलताईंच्या मित्रमंडळींना येत्या रविवारी घरी एकत्र बोलावलंय, त्याचा फोन. पण मी तर लांब गडचिरोलीला. येणं शक्यच नव्हतं.
पण त्या फोनने हादरवलंच मला. कमळी जिवंत आहे की काय? परलोकात गेले, पण आवडतच नाही मला तिथलं. मग आले पळून, असं म्हणून हसत सुटली असती कमळी. कमळीचं हसणं, म्हणजे भीती वाटायची. झेपेल का तिच्या जेमतेम तब्येतीला? पण हसत कोचावर अगदी आडवे होणे, पडणे हीच तिची रीत. हसण्याचा आवाजही एरवीच्या हळू आवाजापेक्षा दहा पटींनी मोठ्ठा. तिचं सगळंच उत्स्फूर्त. आणि वय? ऐंशीच्या पुढं! तिच्या आधीच्या रास्ता पेठेतल्या खोलीवर जायचो. खिडकीला पडदा लावला होता. त्यावर चौकोनाचौकोनाचं डिझाईन. प्रत्येकात एक गणपती छापलेला. मी म्हटलं, कमळे, इथं गणपतींची जनरल बॉडी मीटिंग आहे की काय?’ त्यावर असंच हसत सुटणं, थांबवता न येणं, आणि शेवटी आडवं होणं.
कधी त्याचं दुसरं टोकही.
उमाताईंनी पूर्णचंद्र तेजस्वींच्या चिदंबर रहस्य या कन्नड कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला. त्याचं वाचन ऐकायला आम्ही जमलेलो. तसे त्यांचे अनेक अनुवाद आम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेले. तर शेवटी अनेक अनिष्ट गोष्टींनी जंगल पेटतं, सगळे होरपळून मरतात, फक्त एक तरुण-तरुणी प्रेमिक वाचतात, असं आहे. कमळी आत उठून गेली आणि ओक्सबोक्शी रडत बसली. शांत झाल्यावर म्हणाली, त्यातला शहाणा माणूस पाटील... त्याला तेजस्वींनी का मारावं? शहाण्याचा नेहमीच पराभव जिथे तिथे का दाखवतात? ज्ञानाचा नेहमीच अपमान होतो. तो का सहन करायचा आम्ही?’
आता त्यांच्या शोकाकुलतेची जागा संतापाने घेतली होती.

माझ्या पहिल्या भेटीचा अनुभव असाच. त्यावेळी त्या प्रसिद्ध लेखिका कमल देसाई होत्या. सांगलीच्या जुन्या घरातल्या माडीवर मी दबकतच गेलो होतो. त्यांनी माझी त्यावेळची माणसं, धागे आडवे उभे ही पुस्तकं वाचलेली. त्या आपल्या सगळ्या आदरणीय नेत्यांवरच घसरल्या. तुम्ही आम्हांला हे जे जग दाखवता, माणसं दाखवता, ते जग या मान्यवरांनी का नाही दाखवलं? का आम्हांला अंधारात ठेवलं?’ मी घाबरत म्हणालो, अहो, हे माहीत नव्हतं त्यांना.
त्यावर उसळून म्हणाल्या, मग कशाला म्हणायचं यांना नेते?’
तेव्हापासून मी त्यांच्या गुड बुक्समधे आहे, तो आजवर. अरेच्या, मी शेवटपर्यंत असा शब्द का नाही लिहिला? आजवर? कमाल आहे.
आणि ती किती साधी असावीसुनंदाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक मुलीला दाखल करायचं होतं. मी सुनंदाला सांगून ठेवलं होतं. त्या तिथं आल्या, पण वरच्या मजल्यावर सुनंदाला भेटायला नाही गेल्या. तिथल्या माहिती देणाऱ्या टेबलवर जाऊन ऐटीत सांगणं दूरच, की माझी सुनंदाची ओळख वगैरे. सुनंदा घरी जायला खाली येईपर्यंत त्या बसून राहिल्या. सुनंदा नंतर मला म्हणाली, अरे, त्या कुठं बसल्या होत्या, माहीत आहे की? तिथं समोर खुर्चीवर नाही बसल्या. संडास आहेत ना, त्याच्या शेजार जमिनीवर मांडी घालून बसल्या होत्या.
वा! वा! या काळा सूर्य आणि हॅट घालणाऱ्या बाई या स्त्रीवादी युग निर्माण करणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका, फक्त चार पुस्तके लिहिली, पण ज्यांनी प्रवाह निर्माण केला, त्या लेखिका. पण आता खेड्यातून आलेल्या पेशंटच्या नातेवाइकांसारख्या खुरमुंडी करून खाली बसलेल्या!
नंतर सुनंदाची त्यांची चांगलीच गट्टी जमली. दुपारी घरी जाताना काही वेळा ती कमळीकडे जायची. त्या मस्त जिरेभात करून लोणच्याबरोबर खायच्या. आणि नंतर पडून गप्पा मारायच्या. मी विचारायचो, पडून का? बसून नाही मारता येत?’ कमळी हसून म्हणायची, नाही, नाही. पडून गप्पा मारायला खरी मजा येते. सुनंदा गेल्यावर ती नेहमी म्हणायची, सुनंदाला मी समजले होते, इतकी मी कुणाला कळ्ळेच नव्हते.
कळ्ळं हा तिचा खास उद्गार. कुणा आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या माणसाबाबत विषय असला, तरी तिचा शेरा, त्याला नं, आपला समाज कळ्ळाच नाही. तोही शेरा तेवढ्यापुरताच.
लोणचं लावून भात खाणं, म्हणजे तिच्या सुखाचा कळसच. साधा भात. पण ती थोडं काहीतरी लावून असा चवदार करायची की बस्स. तिच्या एकटीच्या संसारात सगळाच स्वयंपाक आटोपशीर असला, तरी तिच्या हाताला चव होती. एकदा तिने उमाताईंकडे कोळाचे पोहे करून आम्हां सगळ्यांना खाऊ घातले. वेगळाच पदार्थ, चव म्हणाल तर अहाहाच!
रास्ता पेठेतल्या खोलीत गेलं, की कधी त्या पांघरूण जोडून पांघरून घेत आणि वाचत बसलेल्या असत. मी म्हणालो, अहो, बाहेर कुठं थंडी आहे? त्यात आत्ता दुपारचे अकरा बारा वाजताहेत. ती हसून म्हणाली, मला असं पांघरूण घेऊन वाचायला आवडतं. नेहमी काही ना काही वाचत असत. बहुधा इंग्लिश पुस्तकं. साहित्यावर, कुठल्या पुस्तकावर किंवा लेखकावर आम्ही क्वचितच बोलत असू. तरी गप्पा घमासान. बरं, आमच्यात समान धागा काय असावा, तर वरकरणी काही नाही. मला तिची कित्येक मतं पटायची नाहीत. आमचे लिहिण्याचे प्रकारही अलग अलगच. तरी आवडण्यासारखं भरपूर होतं. तिचा मनस्वी स्वभाव आवडायचा. ती तिच्या साठीनंतर भेटली, तरी ती कधी साडीत दिसली नाही. घरात घालायचे गाऊन मात्र तऱ्हेतऱ्हेचे. त्यावरून मी थट्टा करायचो. कधी ती टी-शर्ट पँटही घालायची. सुमित्रा-सुनीलने तिची प्रदीर्घ मुलाखत चित्रित केलीय, त्यात ती टी-शर्ट व पँटमध्ये दिसली.
साहित्याच्या एवढ्या कल्पना उच्च, अनेक आघाडीचे लेखक त्यांनी नापास केलेले. पण हिंदी सिनेमे फार आवडायचे. तेही कुठलेही. दुपारी जवळच्या अपोलो टॉकीजच्या बकाल शोला तिकीट काढताना पाहिलंय. अमिताभ बच्चन आवडता. त्याचा प्रत्येक सिनेमा जाऊन बघणार. पण त्यातही तिरपागडी अट अशी, की तो त्यांच्या अपोलोला लागला असला तरच पाहायचा. तसाच अलीकडचा आवडता लेखक हॅरी पॉटर. मराठी सीरियल पाहणं तिला आवडायचं. त्यावेळी कुणी आलं असलं, तरी सांगायची, मी आत जाते. माझी अमक्या सिरियलची वेळ झालीय. उमाताईंकडे राहायला गेल्या, तरी तिथेही तेच.
मला ती भेटली उतारवयात. तिची अनेक आजारपणं चालू असायची. प्रकृती तोळामासा. तिला मी कधी माझ्या मित्र डॉक्टरांकडे नेलंय, अगदी माझ्या स्कूटरवर मागे बसवून, तरी ती यायची. आधी कमलताई म्हणायचो, नंतर कधी कमळी म्हणू लागलो, ते कळलंच नाही. ती म्हणायची, अशोक (शहाणे) आणि तू या दोघांनाच कमळी म्हणायचा अधिकार. दुर्गा भागवत त्यांचं आदरस्थान. कमळी म्हणायची, दुर्गाताईंना माझी काळजी. म्हणायच्या, कमळे तुझं कसं होणार?’’ रा. भा. पाटणकर आणि ती अहमदाबादला एकत्र शिकवायला होते. त्यांनी कमल देसाईंचे कथाविश्व असं पुस्तकच लिहिलंय. रा. भा. म्हणजे केवढे विद्वान! त्यांच्या सौंदर्यमीमांसा या पायाभूत ग्रंथाला केवढी मान्यता मिळालेली! त्यांनी कमलताईंच्या लेखनावर असं लेखन करावं, हा केवढा बहुमान. पण कमळी तिच्या साहित्याविषयी चकार शब्द काढत नसे. कधीतरी तिची स्त्रीवादी म्हणा किंवा मनुष्य म्हणून रग मी पाहिलीय. लहानपण, तरुणपणाविषयी सांगत होती. म्हणाली, आम्ही बहिणी काळ्या होतो, म्हणून त्या सगळ्यांनी आम्हाला तुच्छ समजावं? काळं असणं हा काही गुन्हा आहे? का आम्हाला त्यावरून लोकांनी टोचावं?’ तिच्या बोलण्यात तिच्या दिवंगत थोरल्या बहिणींविषयी बरंच यायचं. त्यांच्या घरच्या खटल्याविषयी की वादाविषयी यायचं. कधी विषण्ण होऊन म्हणत असे, मला ना, आता मरायचं आहे. मी कारण विचारता, म्हणे, मला कंटाळा आला आहे. मी म्हणायचो, कंटाळा जाईल. दिवस पालटू शकतात. तब्येत सुधारू शकते. पण त्यावर म्हणाली, आता जगावर भार देऊन कशाला जगायचं?’ शेवटी विरूपाक्षांनी (कमळी त्यांना बिरुदा म्हणायची) त्यांना सांगितलं, आपण काही चॉईसनं या जगात आलो नव्हतो. जेव्हा निसर्गतः मृत्यू येईल, तेव्हा येऊ द्यावा. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची?’ त्यानंतर मग तिनं मरणाचा विषय काढला नाही. उलट जगण्याचा आनंद ती घेऊ लागली.
सुमित्रा-सुनीलने कमलताई, एका सिनेमात काम करता का?’ विचारलं, तर ती खो खो हसू लागली. सुमित्रा म्हणाली, या हसण्यासाठीच तुम्ही आमच्या फिल्ममध्ये यावं. कमळी कोकणातल्या त्या गावी गेली आणि त्या तणावमुक्त घरात एक छान रमणारी, हसणारी म्हातारी तिनं रंगवली. रंगवली तरी कशाला म्हणा, ती आहे तश्शीच होती, अगदी कॅमेऱ्यासमोरही.
तिच्या गोतावळ्यात द. ग. गोडसे होते. ते गेल्या पिढीचे मोठे चित्रकार, माझी काही वेळा गाठभेट झालेली. त्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा अशा काही काढल्यात की बस्स. त्यांचं कमळीकडे जाणंयेणं. दोघं म्हातारे छान गप्पा मारत. मीही ऐकण्यासाठी सामील व्हायचो. एकदा मी कमळीला विचारलं, काय म्हणतोय तुझा बॉयफ्रेंड?’ ती आश्चर्याने बघू लागताच मी म्हटलं, गोडसे. तर ती जी हसत सुटली, की थांबेचना.
एक प्रसंग आठवतोय. एकदा जी. एं.वर भरपूर टीका केली. पण जी.ए. गेले. पुण्यात गेले. मी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आलो आणि कमळीकडे गेलो. ही बातमी सांगताच त्या अस्वस्थ झाल्या. आणि नंतर तर ओक्साबोक्शी रडू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटलं. पुढे श्री. पु. भागवत पुण्यात आले. तेव्हा माझ्या स्कूटरवर मागे बसवून त्यांना कमळीकडे घेऊन गेलो. नंतर बाईंचा मूड पालटला.

पहिल्यांदा माझ्याकडे आली, तेव्हा हॉलमध्ये तक्क्याला टेकून बसली. काही वेळानं म्हणाली, तुझ्या घरानं मला स्वीकारलंय बरं का?’ हे तिचं फॅड. मी हसलो. ती म्हणाली, अरे, खरंच सांगते. असं असतंच. घरही आपल्याला स्वीकारतं किंवा नाकारतं.
मी त्यावरनं थट्टा केली, पण ती बधली नाही. म्हणाली, तसं एखादं गावही आपल्याला स्वीकारतं किंवा नाही स्वीकारत. तिनं उदाहरण दिलं, धुळ्याला होते, तर मी धुळ्याला स्वीकारलं होतं, पण धुळ्यानं मला स्वीकारलं नव्हतं. पुढे भिवंडीला आले, तर भिवंडीनं मला स्वीकारलं. पण मी नाही तिला स्वीकारलं. असा सगळा वेडपणपणा! आणि त्या भावनांवर त्या ती नोकरी सोडत, ते गाव सोडत. कुठं एका ठिकाणी त्या टिकल्याच नाहीत. नोकरी पेन्शनीला पात्र व्हायच्या अगोदरच सोडली. अनेक ठिकाणी नोकऱ्या झाल्या. त्यामुळे सोडल्यावर कसल्याही तऱ्हेचे फायदे मिळाले नाहीत. काय म्हणावं या अव्यवहारीपणाला?
पुढे त्यांनी पुणं सोडलंच. सांगलीला गेल्या. भाच्यानं जुनी इमारत पाडून नवी बनवलेली. त्यात कमळीला स्वतंत्र खोली. सांगलीला तिचं बस्तानच बसलं. तिथल्या तरुण कविलेखकांमध्ये ती जाऊ-येऊ लागली. त्यांच्यात बसून चर्चा करू लागली. अधूनमधून त्या बाजूला जाणं झालं की वाकडी वाट करून भेटून यायचो. तिकडे त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला. मी, विरूपाक्ष, उमाताई खास पुण्याहून गेलो होतो. मी तिचे वेळोवेळी फोटो काढलेले. ते मोठे करून संयोजकांकडे पाठवले. ते त्यांनी हौसेने हॉलबाहेरच्या भिंतीवर लावून छोटं प्रदर्शनच भरवलं.
इतके लोक बोलले अगदी भरभरून. (तिचा खरा गौरव सांगली-मिरजकरांनी केलाय. महाराष्ट्र त्याबाबतीत मागेच राहिला. मी अनेक फाउंडेशन्स, अकॅडम्या, सरकार यांना सुचवून पाहिलं. पण यश आलं नाही. हे अर्थाक कमळीच्या नकळत हां. नाहीतर तिनं मारलंच असतं!) तर तो कार्यक्रम मोठा हृद्य झाला. सुमित्रा-सुनीलने शूट केलेली ती मुलाखतही दाखवली. शेवटी सगळ्याला कमळी काय उत्तर देते, त्याची उत्सुकता होती. पण ती बोलेचना. कुणी आग्रह केला तर म्हणाली, इतका वेळ (त्या फिल्ममध्ये) मी बोललेच ना. आणखी काय बोलायचं?’ परत गप्प. एखादीने पंचाहत्तर वर्षांचा सुखदुःखांचा आढावा घेतला असता. गुरुजनांविषयी कृतज्ञता, वगैरे. पण कमळी गप्प. शेवटी म्हणाली, सगळं काय शब्दांतूनच व्यक्त होतं काय?’ अशी ती कमळी.
तेजस्वींच्या कर्वालो या कादंबरीच्या प्रेमात त्या पडल्या. आणि तेव्हापासून त्यांची उमा-विरूपाक्षांशी घट्ट मैत्री झाली. आम्ही बरोबर फिरायला जायचो. आमचा ग्रुपच जमला. मी त्याला चांडाळ चौकडी म्हणायचो. कमळीच्या लग्न न करण्यावरूनही थट्टामस्करी व्हायची. ती म्हणायची, कोणी योग्य भेटला असता तर केलं असतं लग्न.
मी म्हणालो, पण योग्य कोण? एखादं उदाहरण?’ ती म्हणाली, महाभारत लिहिणारा व्यासच एक माझ्यासाठी योग्य आहे. म्हणालो, कमळे, तुला तो योग्य नवरा मिळेल, पण व्यासांचं काय होईल?’ हशाच हशा.
विरूपाक्ष म्हणाले, व्यास म्हणजे राख फासलेला, कित्येक महिने अंघोळ न केलेला, जटा न विंचरलेला असणार... परत हशा.
उमा-विरूपाक्ष संकोची. ते त्यांची थट्टा करायला मागे राहात. ती तर कसले बंधन नसलेली. पण तेही हळूहळू या कल्लोळात, थट्टा करण्यात, करून घेण्यात सामील होऊ लागले. क्या बोला!’ म्हणून कमळी टाळीही देत असे.
उमाताईंची कादंबरी मोठी असली, की दोन दोन दिवस वाचन चालायचं. त्यांच्याकडे दुपारचं जेवण, झोप. परत वाचायला बसायचे.
भैरप्पांनी महाभारतावर लिहिलेली पर्व कादंबरी तिला अजिबात आवडली नाही. त्याला महाभारत कशाशी खातात, ते समजलं नाही. त्यानं लिहिताच कामा नये. त्यांच्या संतापाला मी पंक्चर केलं. म्हणालो, तुझ्या व्यासाचं महाभारत म्हणून तुझी परवानगी घ्यायला हवी होती का?’ त्यावर तसंच हसत सुटणं.
एकदा त्यांच्याकडून आम्ही अस्तित्ववाद ऐकला होता. असेच दोन दिवस सलग. तेव्हा बोलणारी कमळी नेहमीची नव्हती. वेगळंच माणूस बोलतंय जसं.
पुढे सांगलीहून त्या पुण्याला निळावंती बंगल्यात राहायला आल्या. भावाचं निधन झालेलं. भाचा दिलीप आणि भाचेसून नंदू त्या घरात. आणि भावाची पत्नी, त्यांना आम्ही वहिनी म्हणायचो. त्या कमळीपेक्षाही वयानं थोड्या मोठ्या. त्या घराची आठवण जास्त करून माझ्या गाणं म्हणण्याची. केव्हा तरी पहाटे दरवेळी म्हणवून घ्यायच्याच. त्यांच्या वहिनीही येऊन बसायच्या. वहिनी शेवटच्या आजारी पडल्या, तेव्हाही खूण करून मला हेच गाणे म्हणायला लावलं. कमळीला गझल आवडायच्या. त्यात आवारगीची गझल फार आवडायची. इस दश्त मे इक शहर था, वो क्या हुआ, आवारगी ही ओळ त्यातली जास्त आवडती. या वाळवंटात एक शहर होतं, ते कुठं गेलं? म्हणायची, फार गूढ अर्थ आहे त्यात. कधी अब के हम बिछडे...ची फर्माईश... तर कधी रंजिशीची. मला म्हणायची, तू गाण्याकडे लक्ष पुरवायला हवं होतंस. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अऩ्याय केला आहेस.
मी म्हटलं, बरोबर. मी एक गायक झालो असतो. मग मी लिहिलं नसतं. ते चाललं असतं?’
ती निरुत्तर. पण परत पुढच्या वेळी तेच वाक्य. एकदा तिने एक गझल कशी म्हणायची असते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. कुठल्या शब्दावर भर पाहिजे, कुठं गॅप घेतली पाहिजे, वगैरे. मी अलीकडे शास्त्रीय रागांच्या चिजा शिकत होतो. मग काय, शिकलो की, पहिलं प्रात्यक्षिक कमळीपुढं.

कमळी माझी दोस्त कशी झाली? तिचा तिरपागडेपणा माझ्यात नावालाही नाही. मी सरळ सगळ्यांसारखा विचार करणारा, सगळ्यांच्या भाषेत सगळ्यांना समजेल असं बोलणारा, लिहिणारा. ती ज्या प्रकारची लेखिका, त्यातला मी नव्हतो. ती गावांशी, घरांशी, घरातल्या वस्तूंशी बोलणारी. मला तो वेडपटपणा वाटायचा. तिला म्हणायचो, तुला सायकियाट्रिस्टकडे नेलं पाहिजे. पण नको. तोही वेडा होईल. म्हणायला लागेल, हा पेन आत्ताच म्हणत होता, पण तेवढ्यात हा स्टेथो मधेच बडबडला.
कमळी हसून बेजार. उत्सुकतेचे म्हणाली, मग पुढं? स्टेथोला काय म्हणायचं होतं?’
थट्टा करता करता मला त्याची कधी बाधा झाली कळलंच नाही. फिरायला जायचो, तिथली झाडं बोलू लागली. जंगलातल्या वाटा बोलू लागल्या. एवढंच काय, डोक्यावरचा पंखा, दारापासल्या चपला बोलू लागल्या. मग त्यातनं गोष्टी लिहू लागलो. काही वेळा तर असं झालं, लेख लिहायला घेतला. असह्य परिस्थितीतून ज्या व्यक्तीला पुढं जायला वाटच नाही, अशी अशक्य परिस्थिती. तिथं लगेच ही कमळीची फँटसी आली. तिनं एक काय, अनेक रस्ते दाखवले.
मी आनंद (नाडकर्णी)ला म्हणालो, हे सगळे माझ्याशी बोलतात. हे जेव्हा खरं वाटू लागेल, तेव्हा मी तुझ्याकडे ट्रिटमेंटला येईन. कमळीच्या रस्त्याने जाऊ लागलो, तसं मला या विविध वस्तूंना, जीवांना काही अस्तित्व आहे, असं जाणवू लागलं. आपल्यासाठी झिजणाऱ्या चपला. या जुन्या झाल्या की नव्या घ्यायच्या, या फेकून द्यायच्या, हाच माझा खाक्या. आता मला चपलांविषयी अगत्य वाटू लागलं. कृतज्ञतेने मन भरून आलं. कमळीच्या पागलपणात सामील झाल्याने हे मला मिळालेलं धन. थ्रो अवे संस्कृतीपासून दूर होतोच. पण आता याच पागलपणाने वेगळी मजा आणली, तसंच लालित्यही.
अगदी रास्ता पेठेतल्या घरात तिचा माझा एक करार ठरला होता. दोघांनी एकमेकांवर जिवंत असेतो लिहायचं नाही. मी आधी गेलो, तर तिनं लिहायचं, आणि ती आधी गेली, तर मी. तरी करार मोडून ती माझ्यावर कादंबरी लिहिणार होती. ते मागं पडलं. मग लेख लिहिणार होती.
आता सगळंच संपलं. मी अगदी जिवावर आल्यासारखं लिहायला घेतलं. दोन तीन पानं लिहिली. ते जमेना म्हणून पानं फेकून दिली. परत एकदा तस्संच झालं. मग मी कमळीला म्हणालो, तू आता गेली आहेस ना, मग मला ठल्याप्रमाणे लिहून का देत नाहीस?’
आता गडचिरोलीला आलो. निवांत घर, शांत वातावरण. सगळे आपापल्या कामावर गेलेले. तेव्हा कमळी पेनातून आली आणि पेपरावर उतरतच गेली. कमळे, मी करार पूर्ण केला आहे. आता मी जाईन, तेव्हा तू लिहायचं. कशावर लिहिशील? आभाळावर ढगांच्या पेनने? की समुद्रावर वाऱ्याच्या लेखणीने? की कुरणांवर झाडाच्या पेन्सलीने?
आणि म्हणू नकोस, की हा निरोप कळ्ळाच नाही!

(‘अंतर्नादच्या २०११च्या दिवाळी अंकातला लेख, अवचटांच्या परवानगीने इथे. फोटोही त्यांनीच काढलेला.)