कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Monday, November 7, 2011

मिसफिट

- अशोक शहाणे

(कमलताई गेल्यानंतर 'प्रहार'च्या १८ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला मजकूर. मजकुराचं सगळं श्रेय शहाणे, प्रहार, या पानासाठी काम केलेले संपादक इत्यादींना आहे. लेख इथं प्रसिद्ध करण्यासाठी शहाण्यांची परवानगी घेतली आहे. 'प्रहार' शब्दावर क्लिक केल्यावर मूळ पान पाहाता येईल. मूळ प्रसिद्ध झालेल्या मजकुरात तपशिलांच्या दोन चुका होत्या त्या इथं दुरुस्त केल्या आहेत.)

कमल देसाई यांचं खरं तर दुर्दैव असं की, त्यांचं लिखाण समजून घेऊ शकणारे वाचक त्यांना कधीच मिळाले नाहीत. ही त्यांची लेखक म्हणून खंत होती. पण या गोष्टीला इलाज नव्हता. हे नेहमीच असतं. आपण काय लिहितो, ते समजून घेणारा वाचक असेल का, याचा उपाय लेखकाकडे असत नाही. म्हणून ते आपलं समजणारा वाचक कधीतरी निघेल, या भरवशावर लिहीत राहतात. यामुळेच कमल देसाई बऱ्याच दिवसांपासून काही लिहीत नव्हत्या.
आपल्याकडे संवादाचाही मोठा प्रश्न असतो. बाई विद्यापीठात शिकवायच्या. पण तिथेही त्यांना असा अनुभव आला की, आपण जे सांगतो आहोत ते लोकांना ऐकायचंच नाही. मग वेळ घालवून, शिरा ताणून कशाला घ्या. म्हणून त्यांनी विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सांगायचं म्हणजे बाई कशातच बसत नव्हत्या. जिकडे जावं तिकडे आपण मिसफिट आहोत, याची त्यांना कधीकधी खंत वाटायची. लिहिणं सोडा, पण उपजीविकेच्या बाबतीत असं व्हायला लागलं तर काय? त्यामुळे बाई अलीकडे हल्लक झाल्या होत्या. मध्यंतरी त्या काही काळ पुण्यात राहात होत्या. पण ज्यांच्याशी बोलावं अशी माणसं पुण्यात नव्हती. त्यातच त्यांची बालमैत्रीण सुधा (नावकल) मागच्याच वर्षी गेली. त्यानंतर त्या एकटय़ा पडल्या.
मी पुण्यात जायचो तेव्हा त्यांना नेहमी भेटायला जायचो. दोन-तीन महिन्यांपूर्वी गेलो होतो, तेव्हाही त्यांना भेटलो. पण त्या वेळी त्यांच्या भाचेसुनेनं सांगितलं की, 'तुम्ही आता जा. कारण तुम्ही आलात की, त्या बोलायला लागतात आणि मग नंतर त्यांना त्रास होतो.' त्यानंतर मात्र त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. माझ्याविषयी त्यांनी काही वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, तो 'ऑफ द कफ' होता. आमचे संबंध एकमेकांविषयी लेख लिहिण्यापुरते कधीच नव्हते.
दहा वर्षापूर्वी बाईंच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा सांगलीत सत्कार करण्यात आला. मुंबईहून मी आणि रघू दंडवते त्याला गेलो होतो. तिथे बरेच लोक त्यांच्याबद्दल काय काय बोलले. मग त्यांना बोलण्याचा आग्रह करण्यात आला, तर त्या म्हणाल्या, 'मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही बोललात तेच फार झालं.' पण त्यामुळे आयोजक नाराज झाले. त्यांनी बाईंनी बोलावं म्हणून पुन्हा आग्रह केला. तेव्हा त्या म्हणाल्या, 'माझे दोन मित्र मुंबईहून आले आहेत. त्यामुळे मला न बोलण्याचं बळ मिळालं आहे.' त्यांच्या अशा वागण्यानं सगळ्यांचा विरस झाला. पण मला आश्चर्य वाटतं होतं की, त्यांनी हा समारंभ होऊच कसा दिला? त्यावर त्या म्हणाल्या, 'समारंभ झाला काय अन् न झाला काय, त्यानं काही फरक पडत नाही. शिवाय 'नाही' म्हटलं की त्यासाठी जोर लावावा लागतो. त्यापेक्षा करतात तर करू द्या.' म्हणजे बाई म्हटलं तर त्यात होत्या, म्हटलं तर नव्हत्या.
बाई तसं गंमतीशीर प्रकरण होतं. अशी माणसं क्वचितच असतात. ती मुद्दामून शोधावी लागतात. आणि असली तरी आपली आणि त्यांची गाठ पडत नाही. अशी माणसं आता एकेक करून चालली आहेत. पण त्यांची जागा घेणारं कुणी दिसत नाही.

1 comment:

  1. बाईना परफेक्ट म्हणायला हवं. या परफेक्ट पणाबद्दल अजून लिहायला हवं.

    ReplyDelete