कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Wednesday, November 2, 2011

चैतन्य आणि चिंतन

कमल देसाई यांची संजय आर्वीकर यांनी घेतलेली मुलाखत  ‘नव्या अवकाशातील आनंदयात्रा’ या पुस्तकात आहे. वेगवेगळ्या मुलाखतींचं संकलन असलेलं हे पुस्तक ‘पद्मगंधा प्रकाशना’ने २००७ मध्ये प्रसिद्ध केलं. या मुलाखतीतील हा थोडा भाग-


प्रारंभी तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगाल?
- माझे बालपण अतिशय मजेत आणि छान गेले. सुखाचे असा शब्द मी मुद्दाम नाही वापरला. ‘मजा’ हे मला जास्त महत्त्वाचे वाटायचे. आम्ही ब्राह्मण गल्लीत राहत होतो. ब्राह्मणांचेच सगळे संस्कार. त्या वेळी बाकीच्या जाती-जमातीशी संबंध आला असे काही नाही. तरी मला असे वाटते की, आम्ही पुरेसे सामाजिक होतो. आमच्या घरातले वातावरण अतिशय चांगले होते. अनेक जाती-जमातींचे लोक आमच्या घरी येत असत. आमच्या घरात खुलेपणा होता आणि कुठल्याही माणसाचा वावर अगदी सगळीकडे असायचा. अगदी स्वयंपाकघरापर्यंत. आम्ही घरातूनच सुधारक होतो. माझे वडील तर अपरंपार सुधारक होते. सोवळे-ओवळे असले काही नव्हते.
माझी बहीण मामाला दिली असल्याने मी बहिणीकडे मुलीसारखीच वाढले. तिथे माझे जे बालपण गेले, त्याच्या भोवतालचा परिसर ब्राह्मणी असला तरी आमच्याकडे तसे काही नव्हते. शेजारपाजारचे म्हणतही असत की, हे सुधारकी कुटुंब आहे.
आणि दुसरी एक गोष्ट मला जाणवते जी मला महत्त्वाची वाटते की, वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षांपासून मला अगदी एकटे असण्याची फार सवय होती. मला आवडायचं. एकटं असण्यात गोडीच होती. नुसतं इकडे-तिकडे आपले आपण हिंडायचे. आपले आपण राहायचे. आमच्या कुटुंबात इतकी माणसे होती ना, तरी माझे मला आपले एकटे एकटे असण्यात आनंद वाटायचा. गवतातच नाच, कुठे याच शेतात जा, तिकडेच जा, कुठेही जा..

म्हणजे अवतीभोवती माणसांची गर्दी असली तरी एकटं एकटं असणं हे तेव्हापासून का?
-अगदी.. आणि माझ्या त्या एकटेपणावर कोणी एन्क्रोचमेन्ट केलेले मला चालायचे नाही. दुसरीही एक गोष्ट होती की, मी घरातही फार लाडकी होते. खरे म्हणजे मी सर्वांत मोठीही नाही आणि लहानही नाही. घरात तर लहान मुले होती. त्यात मीच का लाडके असावे घरात, ही मला अजूनही न कळलेली गोष्ट आहे. अजूनही! मी.. हे आमचे सांगलीतले घर आहे किंवा कोल्हापूरचे सगळे नातेवाईक आहेत कोणाच्याही घरी मी म्हणजे काहीतरी प्रेशियस गोष्ट आहे.. हे का, हे एक कोडे आहे, तसेच गल्लीमध्ये मी सरसकट मुलांमध्ये मिसळत असे. घरात, कोणी असे मिसळू नये, असे वागू नये, असे कोणी कधी म्हटले नाही. मला मित्र-मैत्रिणी भरपूर, हे सगळे असले तरी माझे माझ्या खोलीत मला एकटे कोंडून घ्यायला आवडायचे. आणखी एका गोष्टीचे मला नवल वाटते. तशी मी काही हुशार नव्हते, सुंदर नव्हते, तरीही गल्लीत कुठूनही मला हाक ऐकू यायची, ‘कमळे, आज घरात हे केलेले आहे.. तू ये बघू इकडे.’ गल्लीतसुद्धा कुणाच्या घरी काही नवा पदार्थ केला तर तो माझ्यासाठी ठेवला जायचा. मला खाण्याचे काही वेड नाही, तरीही हा पदार्थ ठेवला जायचा, हे काय आहे हे अजूनही कळत नाही.
आमच्या शेजारी भोगले मास्तर होते. त्यांना फिड्ल वाजविण्याची सवय होती आणि त्यांचे वडील आजारी होते, तेही चांगले गणिताचे शिक्षक. त्या दोघांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. ते अगदी अंथरुणावर असले तरी दणदणीत आवाजात हाक मारायचे मला.. ‘कमळेऽऽ’ अशी हाक ऐकली, की मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहायची अन् म्हणायची ‘काय?’ मला त्यांची थोडीशी भीती वाटायची तरी पण त्यांची हाक ऐकली की मी पळत सुटायची. धावणं हा एक स्वभाव होता माझा. सगळ्या गल्लीत धावत सुटायची आणि फुलं गोळा करायची, पण मला असे जाणवले नाही बरे का की, माझ्याजवळ चैतन्य होते म्हणून लोक असे काही. अजूनसुद्धा माझ्याभोवताली जे लोक जमलेले आहेत, या लोकांनी का म्हणून माझ्याजवळ यावे आणि मला इतके प्रेम द्यावे, हे न उलगडलेले कोडे आहे, पण मी गल्लीतसुद्धा लीडर होते.

आणि शाळेमध्ये असे काही होते..?
-हॅऽ ट्.. शाळेत तर माझ्यापेक्षा.. काय असायचे माहितीय का, नाटकात काम करायला, ऐन वेळी कोणी गळले, नाही म्हटले तर ऐन वेळी पटकन संवाद पाठ करून उभे राहायला कोण तर.. कमळी.. अरे, तिला बोलव रे, असं. पण मला असं वाटत नाही, मी शाळेत एक चांगली स्टुडण्ट होते म्हणून.

लेखिका म्हणून जडणघडण होण्याशी तुमच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाचा काही संबंध होता का?
-काहीही संबंध नाही. काडीचाही संबंध नाही. उलटा परिणाम वाईट आहे त्याचा. आमचे संस्कृतचे शिक्षक ‘शाकुंतल’ शिकवायचे- अबबऽऽ! इतके घाणेरडे कुणी शिकविले नसेल आणि पुढे आम्हाला असा एक प्रश्न आला होता- तुम्हाला ‘शाकुंतल’ नाटकातला कुठला अंक आवडतो?- तर सगळेजण सांगायचे ना, चौथा अंक सगळ्यात उत्तम, तर मला ते आवडायचे नाही- तर मी वर्तमानपत्रात लिहिले की, सगळे असे म्हणतात की, चौथा अंक चांगला आहे, आपल्याला शिक्षकही हेच सांगतात; परंतु मला मात्र तिसरा अंक जास्त आवडतो आणि त्या अंकात जो प्रणय आहे तो अत्यंत लालित्यपूर्ण आहे. अतिशय लव्हिंग आहे. पाचवा अंकही तितकाच चांगला आहे, पण पाचव्या अंकात विरह आणि त्याच्यात मेलन्कोलिक शेड आहे- माझ्यासारख्या तरुण मुलीला तिसरा अंक जास्त आवडेल की नाही?

१९६२ मध्ये तुमचा पहिला ‘रंग’ हा कथासंग्रह आला. या तुमच्या पहिल्याच कथासंग्रहापासून ब्राउनिंग, डोस्टोव्हस्की, सात्र्, जे. कृष्णमूर्ती, चिनी लोककथा, कॅथार्सिस, शनी माहात्म्य, संत नामदेव असे वेगवेगळे संदर्भ येतात. यात केवढे वैविध्य आहे. तर या संदर्भात तुम्ही स्वत:च्या वाचनाच्या प्रवासाबद्दल काही सांगाल?
- मला स्वत:ला कथा हा वाङ्मय प्रकार आवडतोच. कथा सांगणं, कथा वाचणं, कथा निर्माण करणे, यात मला रसच. कुठेही पुराण सुरू असलं, की तिकडे जाऊन बसायचे अन् ते ऐकायचे. घरातही असे जे वाचतात ते पण ऐकायचे आणि मग वाटायचे की, गमतीच्या कथा आहेत हं या!
कथा करणे ही पण एक गंमत आहे आणि कथा काय.. करीत बसायची आपली आपल्याशी, हा नाद होता मला. काव्य हा प्रकार माझा आहे का, तर नाही, हे मला माहीत होतं. कथा हा प्रकार माझा आहे, तो कसा माझा आहे, तर तो माझा श्वासच आहे. म्हणजे मला जितके जेवायला लागते, तितकी मला कथा चावायला लागते. मग कथा, कादंबरी, नाटक, जे जे म्हणून अशा पद्धतीचे आहे ते ते मला आवडते. त्यामुळे काय झाले, की मी काही असे ठरवून वाचलेले नाही, काय मिळेल ते वाचले आणि असे कोणी कधी मला सांगितले नाही की, हे वाच आणि ते वाचू नको. किंबहुना ज्या वयात जे पुस्तक वाचू नये, हातीही लागू नये, ते मी वाचले. ‘काम आणि कामपूर्ती’ असे एक पुस्तक माझ्या हाती लागले आणि ते मी वाचले, पण कोणाला काही कळलं नाही की, ते मी वाचलंय आणि मला काही कळलंय. म्हणजे वाचनात काही शिस्त होती असं नाही.
पण एक गोष्ट जशी मला समज आली तेव्हापासून कळले होते की, माणसाने नैतिक असावे आणि स्वत:शी प्रचंड प्रामाणिक असले पाहिजे. स्वत:शी हं, लोकांचा त्याच्याशी काही संबंध नाही. मी स्वत:शी खोटं बोलते आहे, असे लक्षात आले तर मी स्वत:ला शिक्षा करून घ्यायची. मला ते खपतच नाही. अजूनसुद्धा नाही. हे एक माझे मूल्य होते आणि हे घेऊन जगत असताना मला जे, जे काही अनुभव येत गेले त्या अनुभवावरून मी माझे जीवन आखण्याचा प्रयत्न केला.

कथालेखन सुरू कसे झाले याबद्दल काही आठवते का?
- एकदा काय झाले की, मला शाळेत नोकरी लागली. शिक्षिकेची. तर ते शाळेमध्ये डेप्युटेशनवर वगैरे पाठवितात ना, तर एकदा मला असे वाटले की, समजा मला नाचासाठी डेप्युटेशनवर पाठविले तर किती गंमत येईल ना.. आणि आमच्या त्या हेडमिस्ट्रेस बाईंना नाटक, नृत्य, कला यांची आवड होती आणि त्यांना माझ्याविषयी कौतुकही होतं.

म्हणजे लेडी विठोबा?
- गंमत वाटली त्या गोष्टीची मला आणि मी ती लिहून ठेवली आणि त्याचे मी पुढे काही केले नव्हते आणि माझा भाऊ आजारी असताना त्याला ती वही सापडली आणि त्याने ती संबंध वाचून काढली आणि म्हणाला, ‘कमळे बरी दिसते गं ही. बघ ‘सत्यकथे’ला पाठवून. माझा दुसरा भाऊ, जो इंग्रजीचा प्रोफेसर होता, त्यानं त्यात हजार चुका काढल्या. ‘तू काही नीट लिहीत नाहीस, तू काही अक्षर नीट काढत नाहीस. लिहिताना नीट नको का लिहायला.’ त्याचा जरा नीटनेटकेपणाकडे कल होता. मला नीटनेटकेपणाचा भयंकर कंटाळा. सारखं काय नीट-नीट. मी घरात एक अत्यंत आळशी, लवकर उठायला नको, काम करायला नको अशी होती.
..तर ती माझ्या इंग्रजीच्या प्राध्यापक भावाने माझ्याकडून नीट लिहून घेतली आणि मग ती पाठविली. मग ती छापून आल्यावर माझी मीच चकित झाले आणि श्री. पुं. नी. (भागवत) मला एक छान पत्र लिहिलं होतं त्या वेळी. तरीसुद्धा मला असं काही वाटलं नाही की, आपण कथाकार आहोत.

तुमचं लेखन वाचत असताना असे लक्षात येते, की  त्यात संगीत, चित्रकला, नाटक यांचे बरेच तपशील आहेत. या कलांशी तुमचे नाते कसे आहे?
- पूर्वी आम्ही मिरजेला राहत होतो आणि थिएटर जवळ होते. बालगंधर्वाचा मुक्कामही असायचा. बालगंधर्वाची जवळजवळ सगळी नाटके मी एकटीने पळत पळत जाऊन पाहिलेली आहेत. त्यांनी केलेली भामिनी मी पाहिलेली आहे आणि मला मुळीच बालगंधर्व आवडायचे नाहीत. इतरही कंपन्यांची नाटकंही पाहिलीत. आनंदघन मंडळींच्या नाटकाच्या मधल्या काळात सिनेमा असायचा. हे मध्येच सिनेमा दाखविणं मला फार आवडायचं आणि तो नाटकामध्ये आत सोडणारा डोअरकीपर आमच्या घरी काम करणारा होता आणि मग म्हणायचा, ‘आली का बाळी माझी’ असं म्हणून आत नेऊन बसवायचा. त्यातले मला काय कळायचे तेव्हा माहीत नाही, पण तो ऑर्गनचा आवाज, गाणे, पडदे, ते नारळ फोडणे, ते घंटा वाजवणे या सगळ्यांचा माझ्यावर भयंकर परिणाम व्हायचा आणि नांदी तर मला खूप आवडायची. विनोदाकडेही माझा ओढा होता. संगीतातला  सूर पकडणे मला कळायचे. चित्रे काही मी त्या काळात बघितली नाहीत, पण नंतरच्या काळात मी ज्या वेळी अ‍ॅस्थेटिक्सचा अभ्यास केला, त्या वेळी चित्रकलेकडे बघायला सुरुवात केली आणि माध्यम या नात्याने रंगरेषांकडे पाहायला सुरुवात केली. पण अजून मला असे वाटत नाही की, चित्र आपल्याला समजते. खरे तर कोणत्याही कलेतले मला काहीही कळत नाही. किंबहुना मला काही समजत नाही हेच मला नीट समजतं.

त्या काळामधली जी काय कथा होती, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
- खरं सांगू का, गाडगीळ, गोखले जेव्हा लिहीत होते, तेव्हा त्यांच्या कथांमधून मला एक जाणवायचं, की 'मला असे वाटते..' अशा प्रकारची वाक्यरचना होती. मला असं सारखं वाटायचं, की ही वाक्यरचना कुठेतरी चूक आहे. ‘असे वाटते.. असे वाटते’ ही काय भानगड आहे. ‘असे त्याला वाटले..’ हे असं सारखं काय येतं हे ‘वाटणं’ ही काय भानगड आहे. वाटणं हा शब्दच कथेमध्ये येता कामा नये.
म्हणजे भाषेच्या पातळीवर मला त्यांच्या कथा आवडायच्या नाहीत आणि त्या सायकॉलॉजिकल असतील तर त्या अशा असता कामा नये, असंही वाटायचं. आम्हाला सेक्सविषयी समजत नाही म्हणून सेक्सविषयी लिहिलं पाहिजे असं दडपण माझ्यावर होतं सारखं. तरीही सेक्सविषयी लिहायला माझं मन घेत नव्हतं. माझं मन बंड करून उठत असे आणि सेक्स वगळून दुसरं काही लिहिता येईल का, असा विचार सारखा माझा चालायचा. त्या काळामध्ये सगळे लेखक सेक्स-ओरिएंटेड कथा लिहीत होते. आणि अशी कथा विभावरी शिरूरकरांनी आधी सुरू करून दिलेलीच होती. मला शिरूरकरांच्या कथा फारशा पसंत नव्हत्या.. माझं बंड त्याच्या विरुद्ध, पण ते कसं दाखवायचं हे मला समजत नव्हतं आणि त्याचा थोडासा मार्ग मला ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ यात सापडला आणि तिथे मी जरा मोकळी होण्याचा प्रयत्न केला.

विस्कटलेल्या कुटुंबाची प्रतिमा तुमच्या लेखनात वारंवार पुनरावृत्त होते, या विस्कटलेल्या कुटुंबाचे चित्रण करणाऱ्या ‘कुटुंब कथा’मधून अंतिमत: तुम्हाला विस्कटलेल्या विश्वाच्या पसाऱ्याचे लघुत्तम रूप उभे करायचे असते का? विश्वरचनेच्या पेशी (सेल्स) या अर्थाने तुम्ही कुटुंबाकडे पाहता का?
- याबद्दल काही सांगता येणार नाही मला, पण भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल मला असे वाटते की, सोसायटी इज्  सिक्.. एरिक फ्रॉम म्हणतो तसं.. आपली सोसायटी सिक् आहे.. ती मृतच आहे, मला तर वाटते की, आपण सारे प्रेतात्मे आहोत आणि जगण्याचे कुठल्याच पातळीवर भान आपल्याला नाही. ही जी जगण्याची प्रक्रिया सुरू आहे.. ती यंत्रवत सुरू आहे. समाज असा या महाराष्ट्रात कुठेही नाही. उलट आहेत त्या टोळ्याच टोळ्या. जातींच्या बांधलेल्या टोळ्या.. या जातीची टोळी, त्या जातीची टोळी आणि या भरभक्कम बांधलेल्या टोळ्या. एकमेकांशी स्पर्धा करतायत. या स्पर्धेतसुद्धा जगण्याचे, अस्तित्वाचे भान नाही. यांत्रिक पारंपरिक जी घडण घडवून दिलेली आहे.. चौकटीत अडकलेले हे मृत आत्मे आहेत. त्यामुळे मला विचारले की, या समाजाला काही भवितव्य आहे का, तर नाही. मला भीती वाटते.. या समाजाला काही भवितव्य आहे असे मला वाटत नाही.
आता मी या लहान मुलांकडे पाहते तेव्हा वाटते, यांना नीट जीवन मिळेल..? हा एक प्रश्न आणि मिळावे ही इच्छा.. या इच्छेने जर खरोखरच भविष्यकाळ आला तर मला आनंद होईल, पण तसा तो आत्ता मला दिसत मात्र नाही.

तुमच्या लेखनातून तुम्ही अशा चाकोरीतल्या जीवनाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करता- जसे ‘रंग’मधील सुमित्रा म्हणते, माझ्या दु:खाला नाव देण्याची, उदात्त करण्याची तुम्हाला घाई झाली आहे, तुमची नायिका अशीच असते, बावळट, कारुण्याने ओथंबलेली किंवा ‘रात्रंदिन’मधील वहिनीचं वर्णन. ते ‘स्व’त्व हरवून मूल्यविहीन जगणं आहे, असं तुम्हाला वाटतं का?
- घालून दिलेल्या सांस्कृतिक चौकटीमध्ये जगायचं.. अठरा वर्षे झाली, मुलीला स्थळ बघा, लग्न करा, चांगला नवरा बघा, त्याला नोकरी आहे ना नीट.. सुरक्षित नोकरी करणारा.. मग घर बांधायचे.. दोन मुले व्हायची, माझे म्हणणे असे आहे की, जीवन अफाट आहे. अंधारात उडी घेऊन नावीन्याचा शोध घ्यावा.. बघावं, काहीतरी वेगळे करावे, असे कुतूहलच नाही. या उबवलेल्या जीवनात किती दिवस तीच स्वप्ने, तेच तेच असे खुळ्यासारखे जगत राहणार आहोत आपण! या अफाट जीवनाच्या असुरक्षित अशा अंधारात उडी घेऊन नवीन शोधायचा प्रयत्न करणारी पिढी जर मिळाली तर मला हवी आहे. मी स्वत: केलेले आहे तसे, त्यामुळे मला हे म्हणण्याचा अधिकार आहे. मी ज्या दिवशी बाहेर पडले घराच्या त्या दिवशी रात्रच होती, काळोख होता, धारवाडातलं घर होतं आमचं.. आणि मी, एकटीच स्टेशनवर गेले, मी मुंबईच्या गाडीत बसले, पण हेही खरं की, मला मुंबईने खूप गोष्टी दिल्या, मुंबईने खूप शिकवले.. असुरक्षित जीवनाला न भिता, अंधारात उडी घेऊन, कुतूहलाने जीवनाचा शोध घेतल्याशिवाय आज आपल्याला पर्याय नाही, असे प्रत्येक स्त्रीने व्यक्ती म्हणून स्वप्न डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

तुमच्या बहुतेक कथांचा फोकस हा स्त्रियांवर असतो. स्त्री, तिचे इतरांशी संबंध, सामाजिक संबंध, तिच्यातील आदिमतेचा अंश, समाजाची तिच्याकडे बघण्याची दृष्टी.. तुमचं लेखन स्त्री- केंद्रित, चांगल्या अर्थाने स्त्रीवादी आहे, असे म्हटले तर ते तुम्हाला मान्य होईल का?
- हो, हो. का नाही मान्य होणार? आवडेल मला. मात्र हेही खरं की, मी लिहीत असताना मात्र असे काही करते आहे हे मला माहीत नव्हते. एवढेच की, मी स्त्री असल्याने मला माहीत असलेल्या गोष्टी लिहायच्या एवढाच उद्देश होता. मग पाटणकरांचे पुस्तक आले, तेव्हा कळले की, त्याच्यात असे काहीतरी आहे म्हणून. नंतर लोकांनी त्याच्यात आणखीही शोधले.
मला स्वत:ला व्यक्ती म्हणून प्रस्थापित करायचे आहे, हे भान ठेवून मी हे केले. कारण हे जाणवत होते की, पुरुषसत्तेमध्ये हे आपल्याला भाव देत नाही आणि आपले जगणे नाकारतात, आपले अस्तित्व नाकारतात आणि यांना कुणी हा अधिकार दिला हो, आपले जगणे आणि अस्तित्व नाकारण्याचा? कोण लागून गेलेत हे? पशू-पक्षी काय, माणसे काय, या सगळ्यांना या जीवनामध्ये ‘अस्तित्व’ आल्यानंतर त्या अस्तित्वाचा सन्मान करायला तुम्ही शिकणार आहात की नाही? हे कोणी सांगितले तुम्हाला की हे नाकारायचे आहे म्हणून?
मला हे नाकारणे आवडले नाही. मी याविरुद्ध बंडच पुकारले. मी व्यक्ती आहे आणि मी स्त्री व्यक्ती आहे आणि स्त्री व्यक्ती म्हणून मी जगणार आणि तुम्हाला मी जगले हे दाखविणार आणि तुम्हाला माझे अस्तित्व मान्य करायला लावणार, इतका मोठ्ठा आविर्भाव घेऊन मी जगण्याचा प्रयत्न केला.
पण त्या वेळी असे काही डोक्यात नव्हते की, आपण लिहायचे किंवा असे काहीतरी करायचे..

मराठी साहित्याचा पन्नासहून अधिक वर्षांचा कालखंड तुम्ही पाहिला आहे. या काळातील कोणती पुस्तके किंवा लेखक तुम्हाला महत्त्वाचे वाटले की, ज्यांचा तुम्ही माइलस्टोन असा उल्लेख कराल?
- खरं सांगायचे तर मला हा प्रश्न रुचत नाही. कारण मला सर्व प्रकारचे वाचायला आवडते आणि वाट्टेल ते वाचणे हा माझा स्वभाव आहे. मी मराठीतील सगळे पॉप्युलर लिटरेचर वाचलेले आहे, म्हणजे सगळा बाबा कदम वाचलेला आहे आणि तो मला अगदी आवडत नाही असे नाही. शिवाजी सावंतची ती कर्णावरची मोठ्ठीच्या मोठी कादंबरी मी मोठ्या आवडीने वाचली. स्त्रियांच्या ज्या कादंबऱ्या आहेत- म्हणजे सुमती क्षेत्रमाडे वगैरेपण मी वाचल्या आहेत. वाचताना हे नको, ते नको असे न करता सगळे वाचावे. त्यातही काही न काही पटकन घेण्यासारखे असते. आपल्याला जे आवडते ते आपण ठेवतो. मराठीमध्ये बघ, फाळणीसंबंधी फारसे कोणी लिहिलेले नाही, पण पॉप्युलर लिटरेचरमधल्या एका लेखिकेने (मला तिचे नाव आठवत नाही) फाळणीमुळे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराविषयी एक सबंध कादंबरी लिहिली आहे. फाळणीविषयी आपले दुर्लक्ष झालेले असताना एक पॉप्युलर लिटरेचरमधली बाई त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहते, याचे मला कौतुक वाटले. म्हणून मला असे वाटत नाही की, अमुक एक लिटरेचर मोठे असते आणि दुसरे लिटरेचर कमी महत्त्वाचे असते. मला लहान मुलांची पुस्तकेही आवडतात.
दुसरी गोष्ट अशी की, साधारण १९५० हे जर आपण वर्ष घेतले आणि मर्ढेकरांपासून सुरुवात केली तर मर्ढेकरांना मराठीचे टी. एस. इलियट समजले जाते. मला काही खास करून मराठी काव्यच कधी आवडले नाही. मर्ढेकरांची कविताही मला आवडत नाही. ती समजली न समजली यात मी जात नाही. खरे म्हणजे चित्रे, कोलटकर यांच्यापासून मला मराठी कविता समजायला लागली, आवडायला लागली, पण मर्ढेकरांच्या काळामध्ये मला शरच्चंद्र मुक्तिबोध जास्त आवडायचे. त्यांच्या कादंबऱ्या आणि कविता दोन्ही. ते माझ्या विचारांना जवळचे वाटायचे.

No comments:

Post a Comment