कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Friday, November 4, 2011

एक सदेह फॅण्टसी

- दुर्गा भागवत

कमल देसाईला मी 'कमळी' म्हणते. माझी म्हटलेली जी काही मोजकी माणसं आहेत त्यात कमळी येते. या माणसांशी बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी असे कुठलेही संबंध मी प्रस्थापित केलेले नाहीत. साधी कौटुंबिक नातीच सांभाळत सांभाळता नाकीनऊ येतात माणसाच्या, तिथे बनावटीची नाती कुठे जोडायला जा? पण विशेष असा की, ही एकच वल्ली अशी आहे की मी तिला मेले, कार्टे, गधडी, शिंची अशा शेलक्या विशेषणांनी कुठेही, कुणापुढेही संबोधते. तीदेखील ती सारी बिरुदे खुशीत येऊन स्वीकारते. असा हा आमचा ऋणानुबंध.

कमळीला मी 'सदेह फॅण्टसी' म्हणते, ('फॅण्टसी'चे मराठी रूपांतर मी 'भ्रान्तिका' असे केले आहे) साध्या गोष्टी - पण पुढे कथा आणि नवकथा या नावाने प्रसिद्ध झालेला प्रकार - लिहिणारी कमळी पुढे अक्षरश: भ्रान्तिका लिहिता लिहिता स्वत:च फॅण्टसी कशी बनून गेली याचा हा आलेख आहे.

'सत्यकथे'त १९४९ साली तिची 'बाई सर्व्या घंटा झाल्या' ही कथा मी वाचली. तेव्हा ती इतर कथांसारखी असली तरी ताजी कथा होती. मला ती फार आवडली, नव्हे तिने माझ्या मनात घर केले. त्याला वर्ष उलटले. १९५० साली मी कशासाठी तरी गावदेवीला लॅबर्नम रोडवरच्या आर्य-महिला समाजाच्या लेडीज हॉस्टेलवर गेले होते. तिथे एम. ए. करीत असलेल्या तीन पोरी मला भेटल्या. हे त्रिकूट इंदू खाड्ये, सुधा कुलकर्णी (नंतर नावकल) आणि कमल देसाई यांचे. हे त्रिदल तेव्हापासून माझ्या नजीकच्या जगात वावरते आहे. कमल देसाई हे नाव ऐकल्यावर मी विचारले, 'बाई सर्व्या घंटा' ही गोष्ट तूच लिहिलीस का? ती हो म्हणाली आणि या तिघींशी माझी गट्टी जमली. इंदू अविवाहित असून बरीच वर्षं रिझर्व्ह बँकेत संशोधन विभागात काम करून निवृत्त होऊन पुण्याला गेली. सुधा लग्न करून नावकल बनली. नावकल कुटुंबाशी माझा अतूट स्नेह निरंतर आहे. तसाच स्नेह समस्त देसाई परिवाराशी आहे. कमळीबाई सर्व्या ढंगाच्या नि तरीसुद्धा थोडा सूर पालटणाऱ्या कथा लिहितच राहिली. त्या कथांचा संग्रह 'रंग' या नावाने 'पॉप्युलर'ने १९६७ साली प्रसिद्ध केला.

'रंग'नंतर तिच्या कथा फॅण्टसीच्या अंगाने आकार घेऊ लागल्या. तिची 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही पहिली कादंबरी १९६४मध्ये प्रसिद्ध झाली. 'रंग' ते 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' हा तिच्या लेखनाचा सुटा व प्रारंभिक टप्पा आहे. 'रंग'मध्ये 'बाई सर्व्या...' ही कथा आहेच. 'बाई सर्व्या घंटा झाल्या' या कथेत लेखिकेने जणू आपल्या आयुष्यभरच्या अस्थिर व्यावसायिक जीवनाची-भविष्यातली कुंडलीच मांडली आहे. कमळीच्या किती नोकऱ्या झाल्या नि ती कुठेच स्थायिक झाली नाही. उत्तम शिक्षिका, शीलवती आणि वक्तृत्वसंपन्न असून हे कसे हे साऱ्यांनाच एक कोडे पडते. विशेष करून माझे जीवनही तसेच अस्थिर असून मीही त्याबद्दल अचंबा करीत राहते.

१९६४नंतर कमळी सतत लिहितच राहिली ती थेट १९८८पर्यंत. पण या काळी तिची वाङ्मयीन घडण बदलली. साफ बदलली. तिच्या 'सत्यकथे'च्या दिवाळी अंकातल्या दोन कादंबऱ्या (की कथा?) 'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' या १९७५ साली मौज प्रकाशनाने काढल्या. एकाच 'पुस्तका'त काढल्या. त्याची दुसरी आवृत्ती अजून निघाली नाही. कमळीतल्या फॅण्टसीने इथून आपला स्वत:चा आकार घेतला. त्या कादंबऱ्याही छोट्याच आहेत. या कादंबऱ्यांनी साहित्यिकांच्या श्रेष्ठ श्रेणीत तिला नेऊन बसवले. ध्रुवासारखे अढळ स्थान तिला प्राप्त करून दिले. कमळीसारखी फॅण्टसी मराठीत अजून कुणाला जमलेली नाही. कमळी फॅण्टसीत का शिरली? नियतीचे क्रूर प्राबल्य, मानवाचा पराभव यांच्या तीव्र जाणिवेने भरलेला आहे. तिची मानवी व्यवहाराची निरीक्षणे खोल व सुजाण आहेत आणि ती व्यक्त करण्याची तिची पद्धत पण अप्रूप आहे. हे कमळीकडे कसे आले?

कमळीच्या आयुष्यातले स्थूल तपशील मला माहीत आहेत. माझ्या मते हे वाङ्मयीन परिवर्तन घडवून आणणारा प्रसंग म्हणजे तिच्यापेक्षा थोरली अशी तिची सुविद्य आणि अतिशय कुशल, बुद्धिमान बहीण शांती हिचा १९७० साली घडलेला मृत्यू असावा. तेव्हापासून नियतीच्या क्रौर्याचे भान तिच्यात सतत चाळवत असल्याचे मला आढळले आहे. दुसऱ्याही अनेक प्रसंगांतून-तेही माणसा-माणसांतल्या प्रथम सलगीनंतर कायम दुरावा अशा प्रसंगातून उद्भवलेले. हे अनुभव साऱ्यांनाच कमी-अधिक प्रसंगात येतात. पण दुसरी माणसे सुखाचा शोध घेतात, लौकिक महत्त्वाकांक्षेचा मागे लागतात नि जगाच्या दृष्टीने 'सुखी' होतात तसे कमळीचे नाही. सुख म्हणजे काय हे तिला नीट कळते. दुसऱ्याच्या सुखाने ती खरोखर सुखावते. पण लगेच हा मूड बदलतो. ती परत स्वत:च्या आत स्वत:ला दडवते. बालपणी प्रत्येक बालकाच्या मनात असलेल्या भयाचा बागुलबोवा कमळीने फॅण्टसीच्या अतुलनीय शक्तीने आपला कायम सोबती केला आहे. बाकीचे तुम्ही आम्ही सारे औट घटकेपुरते तिचे सोबती असतो. तिचे सारे वागणेच 'विचित्र' असते. स्वत:बद्दल शंकित ती आम्हा साऱ्यांच्या सोबतीत असते, तेव्हा ती कुठेतरी किंचित विश्रब्ध पण असते. तिचे वागणे समोर असताना आनंदी दिसते न दिसते तोच ती 'आत' बुडते. 'आत बुडण्याची' तिची कला अजब आहे. इतकी की, ती कुठे गडप झालीय हे बघण्यासाठी बापू देसाई तिच्या बिऱ्हाडी येतात, तर कमळी अंधार करून स्वत:च्या एका खोलीच्या घरात पलंगावर उशी डोकीवर घेऊन पडलेली असते. हा तिचा शिरस्ता साऱ्यांनाच माहीत आहे.

'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' यांच्यावर आमचे जया दडकर इतके खूश आहेत की, विचारू नका. ते म्हणतात, 'मराठीतले खरे कथाकार तीनच. जी. ए., कमल देसाई आणि चि. त्र्यं. खानोलकर. भलतीच ताकदीची बाई.' अशोक शहाणे तिच्या कथांना 'विक्षिप्त कथा' असे मोठ्या अभिमानाने म्हणतो.

आता याच दोन कथांच्या संदर्भात मला दिसलेले मानसचित्र असे - एक पॅरॉनॉइड म्हणजे स्थिरभ्रम वृत्तीचे दर्शन. दोन्ही कथांत - कादंबऱ्यांत मुख्य पात्र स्त्रीच आहे हे विशेष. पॅरॉनॉइड वृत्तीची ती नायिका सबंध गावात नाशाला कारणीभूत झालेले सुंदर शिल्पाकृती असलेलं काळ्या सूर्याचे मंदिर स्फोट करून त्यात आपला बळी देते. हॅट घातलेली बाईदेखील स्टुडिओला आग लावते. या दोन्ही कथांतले चित्रण मॅसोचिस्ट आत्मपीडक वृत्तीने अतोनात भरलेले आहे. शिवाय कमळीतदेखील ही वृत्ती अशी दिसते की, तिला जर कुणी त्रास दिला नाही तर बरेच वाटत नाही. नातेवाईकांची दारुण दु:खे त्यांच्याहून अधिक सोसण्यात तिला 'सुख' वाटते हे मीही पाहिले आहे. ती दु:खे खरेच दारुण आहेत यात शंका नाही. पण सामान्य माणूस त्यांच्यातून मनाने तरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो, तर कमळी त्यांना गच्च कवळून धरते. तरी कमळी ही व्यक्ती म्हणून साऱ्यांनाच आवडते.

कमला दास आणि अमृता प्रीतमपेक्षा कमळी कितीतरी सरस आहे. कमळीचे लेखन कुणाच्या लेखनाबरहुकूम बेतलेले नाही. पाश्चात्य वाङ्मयाची जाण असून त्याचा आधार तिने घेतलेला नाही.

No comments:

Post a Comment