कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Sunday, November 6, 2011

कमल देसाई

कमलताईंना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १ ऑक्टोबर २००४ रोजी प्रकाशित झालेला मजकूर -


बख्खळ पुरस्कारांच्या आजच्या जमान्यातही काही पुरस्कार आपला मान राखून असतात आणि काही काही पुरस्कारविजेते असेही असतात की , ज्यांना तो पुरस्कार मिळाल्याने त्या पुरस्काराचाच सन्मान होत असतो!

चोखंदळ साहित्यिका कमल देसाई यांना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्याचे ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांची हीच भावना झाली; कारण, मोजकेच पण जीवनाचा वेगळाच अर्थ जाणवून देणारे प्रत्ययकारी लेखन करणारी लेखिका म्हणून या ७६ वर्षांच्या लेखिकेने मराठी सारस्वतात स्वत:चे असे एक खास स्थान निर्माण केले आहे.

१० नोव्हेंबर १९२८ रोजी बेळगावजवळच्या यमकनमडी गावी जन्मलेल्या कमल देसाईंनी उभारीची वर्षे अहमदाबाद. धुळे , निपाणी , कागल आदी ठिकठिकाणी मराठीचे अध्यापन करण्यात घालवली. त्यामुळे सत्यकथा , मौज आदी दर्जेदार नियतकालिकांतून मोजकेच लेखन करण्याकडे त्यांचा कल होता.

१९६२ साली ' रंग-एक ' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ' रंग- २' निघायला १९९८ साल उजाडावे लागले , इतका त्यांचा कथालेखनाचा वेग धीमा होता. दरम्यान १९६४ साली ' रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंतर 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९८३ साली 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' हे अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले.

बस्स! एवढेच साहित्य नावावर असतानाही, डॉ. रा. भा. पाटणकर यांच्यासारख्या मर्मग्राही समीक्षकाला १९९४ साली 'कमल देसाई यांचे कथाविश्व' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित करून कमल देसाईंच्या कथालेखनाच्या बलस्थानांचा धांडोळा घ्यावासा वाटला, हे विशेष! कमल देसाई यांचा ' रंग-दोन ' हा कथासंग्रह लेखिकेला अभिप्रेत असलेले सामाजिक, राजकीय भाष्य अधिक नेमकेपणी अधोरेखित करणारा आहे. त्यांचे साहित्य या जगाचे व त्यातील अनेक पातळ्यांवरील अनाकलनीय मानवी व्यवहारांचे ताणतणाव; सभोवतालचे वास्तव व अंतर्मन यांत अविरत सुरू असलेले द्वंद्व; मानवी जगात मोठ्या प्रमाणात आढळणारी हिंसा व वेदना- या साऱ्याचे आगळेवेगळे आकलन वाचकांना घडवते. संज्ञाप्रवाही लेखनशैलीमुळे बाह्य वास्तवाच्या चित्रणापेक्षा , त्या वास्तवाच्या अनेकपदरी प्रतिक्रिया उमटवणारे मनोविश्लेषणात्मक लेखन त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची व सघन पोत देऊन जाते. गोष्ट सांगणे, कथाभाग पुढे सरकावणे, पात्रे/प्रसंग/वातावरणनिर्मिती इत्यादी घटकतत्त्वांना कमल देसाईंमधील कथाकार/ कादंबरीकाराने ताकदीने नवी परिमाणे दिली. वाट्याला आलेले बरेवाईट आयुष्य जगत असताना माणसांना क्षणोक्षणी पडणारे नैतिक/मनोवैज्ञानिक/ आदिभौतिक प्रश्न ही साहित्यिका आपल्या कसदार साहित्यातून समर्थपणे हाताळते. त्यामुळेच त्यांचे लेखन एक वेगळीच उंची गाठते. कमल देसाई यांचे हार्दिक अभिनंदन!

No comments:

Post a Comment