कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Tuesday, November 1, 2011

कमल देसाईंची कामगिरी

- रेखा इनामदार-साने

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) मराठी विभागाने जानेवारी २०००मध्ये 'गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी' या विषयावर चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात वाचल्या गेलेल्या 'गेल्या अर्धशतकातील स्त्री-कादंबरीकारांची कामगिरी' या निबंधाचा कमलताईंसंबंधीचा भाग इथे दिला आहे. इनामदार-साने यांचा मूळ पूर्ण निबंध 'गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी' या विलास खोले यांनी संपादित केलेल्या नि 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तक ऑगस्ट २००२मध्ये प्रकाशित झालंय.

'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' (१९६४) आणि 'काळा सूर्य व हॅट घालणारी बाई' (१९७५) असे अत्यंत मोजके लेखन कमल देसाईंनी केलेले आहे. अतिभौतिकीय, सनातन स्वरूपाच्या प्रश्नांचे भान, अमूर्त तत्त्वचिंतनात्मक वृत्ती, नेणिवेतील धूसरता, अनुभवातील व्यामिश्रता व संज्ञाप्रवाही शैली या साऱ्या विशेषांमुळे कमल देसाई यांचे कादंबरीविश्व अजोड वाटते. कथानकात सुसूत्रता, कार्यकारणभाव, कालानुक्रम न पाळता (वर्तमान -भूत-वर्तमान किंवा वर्तमान-भविष्य-वर्तमान असे प्रवास त्यांच्या व्यक्तिरेखा लीलया करतात). केवळ अनुभवप्रामाण्य मानणे, प्रतिमा-प्रतीके यांची व पौर्वात्य-पाश्चिमात्य साहित्यकृतीतील संदर्भांची योजना आणि ऐंद्रिय संवेदनांचे मिश्रण यामुळे या कादंबऱ्या आकलनसुलभ राहत नाहीत, त्या दुर्बोध वाटतात. ''आपण तिथं कां गेलो होतो? परत कां आलो? कसला हेतू आहे त्याच्या मुळाशी?.. अर्थ काय रे या साऱ्याचा?... ही माती, ही खुर्ची, हा तू, ही मी - कसली संगती आहे यात? कसला हेतू असेल यात? का काहीच नाही? कशाचा अर्थच कशाला लागत नाही. एकाकी, हास्यास्पद वाटतं, असंच असतं का रे जीवन?'' कितीही. खूप व केवढाही खोल विचार केला तरी जीवनाचे समग्र स्वरूप अनाकलनीय व अतर्क्य राहते. इंटरेस्टिंग व अम्युझिंग असे जीवनाचे रूप दाखवताना लेखिका तिच्या विक्षिप्त भासेल अशा विनोदबुद्धीने चाकोरीबद्ध जीवनरीतीचा कसा उपहास करते ते पाहण्यासारखे आहे. ''थोड्या स्थूल, तृप्त, गोड चेहऱ्याच्या, केवड्याची कांती जपणाऱ्या वहिनी फार समंजस. मिळतंजुळतं घेणाऱ्या. व्यवहार-वेळ ओळखणाऱ्या, ओळखून वागणाऱ्या. त्या स्त्री-किर्लोस्कर नियमित वाचायच्या. त्यावरूनच त्यांना समजलं - आधुनिक स्त्रीपुढं खूप समस्या आहेत. याला उपाय काय? आपलं आपणच सोडवलं पाहिजे. प्रथम आपल्याला काय हवं ते ओळखायचं! वहिनींनी तसं ओळखलं... माणसानं तडजोड करावी. नऊवारी नेसून सडा घालावा. (सुलोचना नेहमी सिनेमात घालते तसा!) आणि सर्वांना चहा करून द्यावा मग आपण घ्यावा. असं केल्यानं काय होतं? संसार सुखाचा होतो. (रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, पृष्ठं ६१-६२). अशा सुबक, नेटक्या संसाराच्या घडणीत गबाळग्रंथी, छांदिष्ट 'कविता करून मोठं होण्याची' आस लागलेल्या, हळव्या, मधूच्या कुटुंबाभोवती पाकोळीसारख्या भिरभिरणाऱ्या सुशीलेला काही स्थानच नाही. पुढे तर तिला वाळीत टाकले जाते पण 'आयुष्य किती कठीण आणि अशक्य, किती मूढ करणारं आणि या दोन्ही अनुभवांना पचवण्याची शक्ती असली तर केवढं मनोरंजक' आहे ते जाणण्या-पाहण्यात तिचा जीव रमलेला आहे.
'काळा सूर्य'मधील विरंची या ओसाडनगरीत राहणाऱ्या नायिकेला 'जड, आळसटलेले' उथळ, लिबलिबित प्रेम तिरस्करणीय, नकोनकोसे वाटते. तिला प्रस्थापित मूल्यव्यवस्थेचे दडपण झुगारून देणाऱ्या अश्वरथासारखे 'स्वच्छ व करकचून' जगायचे आहे. अंतःकरण यातनांनी पिळवटून निघाल्याविना अस्तित्वाची तीक्ष्ण खूण कशी पटणार, त्यामुळे पापाच्या खाईत ती रसरसून उडी घेते. ईश्वराशी भांडण मांडते. नीच, अधम बेंद्रेचे तिला आकर्षण वाटते. पण अखेरीस उरते ती 'एकटेपणाची जाणीव पुरेपूर भोगण्याची इच्छा.' 'हॅट'मधील नायिकेचा स्मृतिभंश झाल्याने आपोआपच काळ व अवकाश या दोन तत्त्वांशी मुक्तपणे खेळणे लेखिकेला शक्य झाले आहे. भूतकालाचा सांधा येथे निखळलेला असल्याने स्मृतींवर आधारलेली अनुभवाची सलगताही प्रत्ययास येत नाही. त्यामुळे 'मी अत्ता या क्षणी तुमच्याशी का बोलत असावं दुसरीकडं का नसावं' हा प्रश्न इथे तिला व तिच्यापेक्षा अधिक भोवतालच्या लोकांना सतावतो. अस्तित्ववादी व अतिवास्तववादी जाणिवांची इतकी कलात्मक व परिणामकारक अभिव्यक्ती या एकाच लेखिकेला साधलेली आहे. (आतापर्यंत तिला कोणी वारसदार लाभलेला नाही.) या तऱ्हेचा संवेदनस्वभाव आणि परिणतप्रज्ञ व्यक्तिमत्त्व अपवादानेचे आढळते. यामुळे कमल देसाईंची कामगिरी मराठी कादंबरीच्या परंपरेत उठून-उमटून दिसणारी आहे.

No comments:

Post a Comment