कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Thursday, November 3, 2011

कमलताई


- अनिल अवचट

कमल देसाई
परवा मोबाइल वाजला आणि नाव बघतो, तर काय? कमळी? म्हणजे? कमळी जिवंत आहे की काय? जगाला असा गुंगारा दिला होय?
पण फोनवर होती कमलताईंची सून. नंदू. कमलताईंच्या मित्रमंडळींना येत्या रविवारी घरी एकत्र बोलावलंय, त्याचा फोन. पण मी तर लांब गडचिरोलीला. येणं शक्यच नव्हतं.
पण त्या फोनने हादरवलंच मला. कमळी जिवंत आहे की काय? परलोकात गेले, पण आवडतच नाही मला तिथलं. मग आले पळून, असं म्हणून हसत सुटली असती कमळी. कमळीचं हसणं, म्हणजे भीती वाटायची. झेपेल का तिच्या जेमतेम तब्येतीला? पण हसत कोचावर अगदी आडवे होणे, पडणे हीच तिची रीत. हसण्याचा आवाजही एरवीच्या हळू आवाजापेक्षा दहा पटींनी मोठ्ठा. तिचं सगळंच उत्स्फूर्त. आणि वय? ऐंशीच्या पुढं! तिच्या आधीच्या रास्ता पेठेतल्या खोलीवर जायचो. खिडकीला पडदा लावला होता. त्यावर चौकोनाचौकोनाचं डिझाईन. प्रत्येकात एक गणपती छापलेला. मी म्हटलं, कमळे, इथं गणपतींची जनरल बॉडी मीटिंग आहे की काय?’ त्यावर असंच हसत सुटणं, थांबवता न येणं, आणि शेवटी आडवं होणं.
कधी त्याचं दुसरं टोकही.
उमाताईंनी पूर्णचंद्र तेजस्वींच्या चिदंबर रहस्य या कन्नड कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला. त्याचं वाचन ऐकायला आम्ही जमलेलो. तसे त्यांचे अनेक अनुवाद आम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेले. तर शेवटी अनेक अनिष्ट गोष्टींनी जंगल पेटतं, सगळे होरपळून मरतात, फक्त एक तरुण-तरुणी प्रेमिक वाचतात, असं आहे. कमळी आत उठून गेली आणि ओक्सबोक्शी रडत बसली. शांत झाल्यावर म्हणाली, त्यातला शहाणा माणूस पाटील... त्याला तेजस्वींनी का मारावं? शहाण्याचा नेहमीच पराभव जिथे तिथे का दाखवतात? ज्ञानाचा नेहमीच अपमान होतो. तो का सहन करायचा आम्ही?’
आता त्यांच्या शोकाकुलतेची जागा संतापाने घेतली होती.

माझ्या पहिल्या भेटीचा अनुभव असाच. त्यावेळी त्या प्रसिद्ध लेखिका कमल देसाई होत्या. सांगलीच्या जुन्या घरातल्या माडीवर मी दबकतच गेलो होतो. त्यांनी माझी त्यावेळची माणसं, धागे आडवे उभे ही पुस्तकं वाचलेली. त्या आपल्या सगळ्या आदरणीय नेत्यांवरच घसरल्या. तुम्ही आम्हांला हे जे जग दाखवता, माणसं दाखवता, ते जग या मान्यवरांनी का नाही दाखवलं? का आम्हांला अंधारात ठेवलं?’ मी घाबरत म्हणालो, अहो, हे माहीत नव्हतं त्यांना.
त्यावर उसळून म्हणाल्या, मग कशाला म्हणायचं यांना नेते?’
तेव्हापासून मी त्यांच्या गुड बुक्समधे आहे, तो आजवर. अरेच्या, मी शेवटपर्यंत असा शब्द का नाही लिहिला? आजवर? कमाल आहे.
आणि ती किती साधी असावीसुनंदाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक मुलीला दाखल करायचं होतं. मी सुनंदाला सांगून ठेवलं होतं. त्या तिथं आल्या, पण वरच्या मजल्यावर सुनंदाला भेटायला नाही गेल्या. तिथल्या माहिती देणाऱ्या टेबलवर जाऊन ऐटीत सांगणं दूरच, की माझी सुनंदाची ओळख वगैरे. सुनंदा घरी जायला खाली येईपर्यंत त्या बसून राहिल्या. सुनंदा नंतर मला म्हणाली, अरे, त्या कुठं बसल्या होत्या, माहीत आहे की? तिथं समोर खुर्चीवर नाही बसल्या. संडास आहेत ना, त्याच्या शेजार जमिनीवर मांडी घालून बसल्या होत्या.
वा! वा! या काळा सूर्य आणि हॅट घालणाऱ्या बाई या स्त्रीवादी युग निर्माण करणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका, फक्त चार पुस्तके लिहिली, पण ज्यांनी प्रवाह निर्माण केला, त्या लेखिका. पण आता खेड्यातून आलेल्या पेशंटच्या नातेवाइकांसारख्या खुरमुंडी करून खाली बसलेल्या!
नंतर सुनंदाची त्यांची चांगलीच गट्टी जमली. दुपारी घरी जाताना काही वेळा ती कमळीकडे जायची. त्या मस्त जिरेभात करून लोणच्याबरोबर खायच्या. आणि नंतर पडून गप्पा मारायच्या. मी विचारायचो, पडून का? बसून नाही मारता येत?’ कमळी हसून म्हणायची, नाही, नाही. पडून गप्पा मारायला खरी मजा येते. सुनंदा गेल्यावर ती नेहमी म्हणायची, सुनंदाला मी समजले होते, इतकी मी कुणाला कळ्ळेच नव्हते.
कळ्ळं हा तिचा खास उद्गार. कुणा आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या माणसाबाबत विषय असला, तरी तिचा शेरा, त्याला नं, आपला समाज कळ्ळाच नाही. तोही शेरा तेवढ्यापुरताच.
लोणचं लावून भात खाणं, म्हणजे तिच्या सुखाचा कळसच. साधा भात. पण ती थोडं काहीतरी लावून असा चवदार करायची की बस्स. तिच्या एकटीच्या संसारात सगळाच स्वयंपाक आटोपशीर असला, तरी तिच्या हाताला चव होती. एकदा तिने उमाताईंकडे कोळाचे पोहे करून आम्हां सगळ्यांना खाऊ घातले. वेगळाच पदार्थ, चव म्हणाल तर अहाहाच!
रास्ता पेठेतल्या खोलीत गेलं, की कधी त्या पांघरूण जोडून पांघरून घेत आणि वाचत बसलेल्या असत. मी म्हणालो, अहो, बाहेर कुठं थंडी आहे? त्यात आत्ता दुपारचे अकरा बारा वाजताहेत. ती हसून म्हणाली, मला असं पांघरूण घेऊन वाचायला आवडतं. नेहमी काही ना काही वाचत असत. बहुधा इंग्लिश पुस्तकं. साहित्यावर, कुठल्या पुस्तकावर किंवा लेखकावर आम्ही क्वचितच बोलत असू. तरी गप्पा घमासान. बरं, आमच्यात समान धागा काय असावा, तर वरकरणी काही नाही. मला तिची कित्येक मतं पटायची नाहीत. आमचे लिहिण्याचे प्रकारही अलग अलगच. तरी आवडण्यासारखं भरपूर होतं. तिचा मनस्वी स्वभाव आवडायचा. ती तिच्या साठीनंतर भेटली, तरी ती कधी साडीत दिसली नाही. घरात घालायचे गाऊन मात्र तऱ्हेतऱ्हेचे. त्यावरून मी थट्टा करायचो. कधी ती टी-शर्ट पँटही घालायची. सुमित्रा-सुनीलने तिची प्रदीर्घ मुलाखत चित्रित केलीय, त्यात ती टी-शर्ट व पँटमध्ये दिसली.
साहित्याच्या एवढ्या कल्पना उच्च, अनेक आघाडीचे लेखक त्यांनी नापास केलेले. पण हिंदी सिनेमे फार आवडायचे. तेही कुठलेही. दुपारी जवळच्या अपोलो टॉकीजच्या बकाल शोला तिकीट काढताना पाहिलंय. अमिताभ बच्चन आवडता. त्याचा प्रत्येक सिनेमा जाऊन बघणार. पण त्यातही तिरपागडी अट अशी, की तो त्यांच्या अपोलोला लागला असला तरच पाहायचा. तसाच अलीकडचा आवडता लेखक हॅरी पॉटर. मराठी सीरियल पाहणं तिला आवडायचं. त्यावेळी कुणी आलं असलं, तरी सांगायची, मी आत जाते. माझी अमक्या सिरियलची वेळ झालीय. उमाताईंकडे राहायला गेल्या, तरी तिथेही तेच.
मला ती भेटली उतारवयात. तिची अनेक आजारपणं चालू असायची. प्रकृती तोळामासा. तिला मी कधी माझ्या मित्र डॉक्टरांकडे नेलंय, अगदी माझ्या स्कूटरवर मागे बसवून, तरी ती यायची. आधी कमलताई म्हणायचो, नंतर कधी कमळी म्हणू लागलो, ते कळलंच नाही. ती म्हणायची, अशोक (शहाणे) आणि तू या दोघांनाच कमळी म्हणायचा अधिकार. दुर्गा भागवत त्यांचं आदरस्थान. कमळी म्हणायची, दुर्गाताईंना माझी काळजी. म्हणायच्या, कमळे तुझं कसं होणार?’’ रा. भा. पाटणकर आणि ती अहमदाबादला एकत्र शिकवायला होते. त्यांनी कमल देसाईंचे कथाविश्व असं पुस्तकच लिहिलंय. रा. भा. म्हणजे केवढे विद्वान! त्यांच्या सौंदर्यमीमांसा या पायाभूत ग्रंथाला केवढी मान्यता मिळालेली! त्यांनी कमलताईंच्या लेखनावर असं लेखन करावं, हा केवढा बहुमान. पण कमळी तिच्या साहित्याविषयी चकार शब्द काढत नसे. कधीतरी तिची स्त्रीवादी म्हणा किंवा मनुष्य म्हणून रग मी पाहिलीय. लहानपण, तरुणपणाविषयी सांगत होती. म्हणाली, आम्ही बहिणी काळ्या होतो, म्हणून त्या सगळ्यांनी आम्हाला तुच्छ समजावं? काळं असणं हा काही गुन्हा आहे? का आम्हाला त्यावरून लोकांनी टोचावं?’ तिच्या बोलण्यात तिच्या दिवंगत थोरल्या बहिणींविषयी बरंच यायचं. त्यांच्या घरच्या खटल्याविषयी की वादाविषयी यायचं. कधी विषण्ण होऊन म्हणत असे, मला ना, आता मरायचं आहे. मी कारण विचारता, म्हणे, मला कंटाळा आला आहे. मी म्हणायचो, कंटाळा जाईल. दिवस पालटू शकतात. तब्येत सुधारू शकते. पण त्यावर म्हणाली, आता जगावर भार देऊन कशाला जगायचं?’ शेवटी विरूपाक्षांनी (कमळी त्यांना बिरुदा म्हणायची) त्यांना सांगितलं, आपण काही चॉईसनं या जगात आलो नव्हतो. जेव्हा निसर्गतः मृत्यू येईल, तेव्हा येऊ द्यावा. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची?’ त्यानंतर मग तिनं मरणाचा विषय काढला नाही. उलट जगण्याचा आनंद ती घेऊ लागली.
सुमित्रा-सुनीलने कमलताई, एका सिनेमात काम करता का?’ विचारलं, तर ती खो खो हसू लागली. सुमित्रा म्हणाली, या हसण्यासाठीच तुम्ही आमच्या फिल्ममध्ये यावं. कमळी कोकणातल्या त्या गावी गेली आणि त्या तणावमुक्त घरात एक छान रमणारी, हसणारी म्हातारी तिनं रंगवली. रंगवली तरी कशाला म्हणा, ती आहे तश्शीच होती, अगदी कॅमेऱ्यासमोरही.
तिच्या गोतावळ्यात द. ग. गोडसे होते. ते गेल्या पिढीचे मोठे चित्रकार, माझी काही वेळा गाठभेट झालेली. त्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा अशा काही काढल्यात की बस्स. त्यांचं कमळीकडे जाणंयेणं. दोघं म्हातारे छान गप्पा मारत. मीही ऐकण्यासाठी सामील व्हायचो. एकदा मी कमळीला विचारलं, काय म्हणतोय तुझा बॉयफ्रेंड?’ ती आश्चर्याने बघू लागताच मी म्हटलं, गोडसे. तर ती जी हसत सुटली, की थांबेचना.
एक प्रसंग आठवतोय. एकदा जी. एं.वर भरपूर टीका केली. पण जी.ए. गेले. पुण्यात गेले. मी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आलो आणि कमळीकडे गेलो. ही बातमी सांगताच त्या अस्वस्थ झाल्या. आणि नंतर तर ओक्साबोक्शी रडू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटलं. पुढे श्री. पु. भागवत पुण्यात आले. तेव्हा माझ्या स्कूटरवर मागे बसवून त्यांना कमळीकडे घेऊन गेलो. नंतर बाईंचा मूड पालटला.

पहिल्यांदा माझ्याकडे आली, तेव्हा हॉलमध्ये तक्क्याला टेकून बसली. काही वेळानं म्हणाली, तुझ्या घरानं मला स्वीकारलंय बरं का?’ हे तिचं फॅड. मी हसलो. ती म्हणाली, अरे, खरंच सांगते. असं असतंच. घरही आपल्याला स्वीकारतं किंवा नाकारतं.
मी त्यावरनं थट्टा केली, पण ती बधली नाही. म्हणाली, तसं एखादं गावही आपल्याला स्वीकारतं किंवा नाही स्वीकारत. तिनं उदाहरण दिलं, धुळ्याला होते, तर मी धुळ्याला स्वीकारलं होतं, पण धुळ्यानं मला स्वीकारलं नव्हतं. पुढे भिवंडीला आले, तर भिवंडीनं मला स्वीकारलं. पण मी नाही तिला स्वीकारलं. असा सगळा वेडपणपणा! आणि त्या भावनांवर त्या ती नोकरी सोडत, ते गाव सोडत. कुठं एका ठिकाणी त्या टिकल्याच नाहीत. नोकरी पेन्शनीला पात्र व्हायच्या अगोदरच सोडली. अनेक ठिकाणी नोकऱ्या झाल्या. त्यामुळे सोडल्यावर कसल्याही तऱ्हेचे फायदे मिळाले नाहीत. काय म्हणावं या अव्यवहारीपणाला?
पुढे त्यांनी पुणं सोडलंच. सांगलीला गेल्या. भाच्यानं जुनी इमारत पाडून नवी बनवलेली. त्यात कमळीला स्वतंत्र खोली. सांगलीला तिचं बस्तानच बसलं. तिथल्या तरुण कविलेखकांमध्ये ती जाऊ-येऊ लागली. त्यांच्यात बसून चर्चा करू लागली. अधूनमधून त्या बाजूला जाणं झालं की वाकडी वाट करून भेटून यायचो. तिकडे त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला. मी, विरूपाक्ष, उमाताई खास पुण्याहून गेलो होतो. मी तिचे वेळोवेळी फोटो काढलेले. ते मोठे करून संयोजकांकडे पाठवले. ते त्यांनी हौसेने हॉलबाहेरच्या भिंतीवर लावून छोटं प्रदर्शनच भरवलं.
इतके लोक बोलले अगदी भरभरून. (तिचा खरा गौरव सांगली-मिरजकरांनी केलाय. महाराष्ट्र त्याबाबतीत मागेच राहिला. मी अनेक फाउंडेशन्स, अकॅडम्या, सरकार यांना सुचवून पाहिलं. पण यश आलं नाही. हे अर्थाक कमळीच्या नकळत हां. नाहीतर तिनं मारलंच असतं!) तर तो कार्यक्रम मोठा हृद्य झाला. सुमित्रा-सुनीलने शूट केलेली ती मुलाखतही दाखवली. शेवटी सगळ्याला कमळी काय उत्तर देते, त्याची उत्सुकता होती. पण ती बोलेचना. कुणी आग्रह केला तर म्हणाली, इतका वेळ (त्या फिल्ममध्ये) मी बोललेच ना. आणखी काय बोलायचं?’ परत गप्प. एखादीने पंचाहत्तर वर्षांचा सुखदुःखांचा आढावा घेतला असता. गुरुजनांविषयी कृतज्ञता, वगैरे. पण कमळी गप्प. शेवटी म्हणाली, सगळं काय शब्दांतूनच व्यक्त होतं काय?’ अशी ती कमळी.
तेजस्वींच्या कर्वालो या कादंबरीच्या प्रेमात त्या पडल्या. आणि तेव्हापासून त्यांची उमा-विरूपाक्षांशी घट्ट मैत्री झाली. आम्ही बरोबर फिरायला जायचो. आमचा ग्रुपच जमला. मी त्याला चांडाळ चौकडी म्हणायचो. कमळीच्या लग्न न करण्यावरूनही थट्टामस्करी व्हायची. ती म्हणायची, कोणी योग्य भेटला असता तर केलं असतं लग्न.
मी म्हणालो, पण योग्य कोण? एखादं उदाहरण?’ ती म्हणाली, महाभारत लिहिणारा व्यासच एक माझ्यासाठी योग्य आहे. म्हणालो, कमळे, तुला तो योग्य नवरा मिळेल, पण व्यासांचं काय होईल?’ हशाच हशा.
विरूपाक्ष म्हणाले, व्यास म्हणजे राख फासलेला, कित्येक महिने अंघोळ न केलेला, जटा न विंचरलेला असणार... परत हशा.
उमा-विरूपाक्ष संकोची. ते त्यांची थट्टा करायला मागे राहात. ती तर कसले बंधन नसलेली. पण तेही हळूहळू या कल्लोळात, थट्टा करण्यात, करून घेण्यात सामील होऊ लागले. क्या बोला!’ म्हणून कमळी टाळीही देत असे.
उमाताईंची कादंबरी मोठी असली, की दोन दोन दिवस वाचन चालायचं. त्यांच्याकडे दुपारचं जेवण, झोप. परत वाचायला बसायचे.
भैरप्पांनी महाभारतावर लिहिलेली पर्व कादंबरी तिला अजिबात आवडली नाही. त्याला महाभारत कशाशी खातात, ते समजलं नाही. त्यानं लिहिताच कामा नये. त्यांच्या संतापाला मी पंक्चर केलं. म्हणालो, तुझ्या व्यासाचं महाभारत म्हणून तुझी परवानगी घ्यायला हवी होती का?’ त्यावर तसंच हसत सुटणं.
एकदा त्यांच्याकडून आम्ही अस्तित्ववाद ऐकला होता. असेच दोन दिवस सलग. तेव्हा बोलणारी कमळी नेहमीची नव्हती. वेगळंच माणूस बोलतंय जसं.
पुढे सांगलीहून त्या पुण्याला निळावंती बंगल्यात राहायला आल्या. भावाचं निधन झालेलं. भाचा दिलीप आणि भाचेसून नंदू त्या घरात. आणि भावाची पत्नी, त्यांना आम्ही वहिनी म्हणायचो. त्या कमळीपेक्षाही वयानं थोड्या मोठ्या. त्या घराची आठवण जास्त करून माझ्या गाणं म्हणण्याची. केव्हा तरी पहाटे दरवेळी म्हणवून घ्यायच्याच. त्यांच्या वहिनीही येऊन बसायच्या. वहिनी शेवटच्या आजारी पडल्या, तेव्हाही खूण करून मला हेच गाणे म्हणायला लावलं. कमळीला गझल आवडायच्या. त्यात आवारगीची गझल फार आवडायची. इस दश्त मे इक शहर था, वो क्या हुआ, आवारगी ही ओळ त्यातली जास्त आवडती. या वाळवंटात एक शहर होतं, ते कुठं गेलं? म्हणायची, फार गूढ अर्थ आहे त्यात. कधी अब के हम बिछडे...ची फर्माईश... तर कधी रंजिशीची. मला म्हणायची, तू गाण्याकडे लक्ष पुरवायला हवं होतंस. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अऩ्याय केला आहेस.
मी म्हटलं, बरोबर. मी एक गायक झालो असतो. मग मी लिहिलं नसतं. ते चाललं असतं?’
ती निरुत्तर. पण परत पुढच्या वेळी तेच वाक्य. एकदा तिने एक गझल कशी म्हणायची असते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. कुठल्या शब्दावर भर पाहिजे, कुठं गॅप घेतली पाहिजे, वगैरे. मी अलीकडे शास्त्रीय रागांच्या चिजा शिकत होतो. मग काय, शिकलो की, पहिलं प्रात्यक्षिक कमळीपुढं.

कमळी माझी दोस्त कशी झाली? तिचा तिरपागडेपणा माझ्यात नावालाही नाही. मी सरळ सगळ्यांसारखा विचार करणारा, सगळ्यांच्या भाषेत सगळ्यांना समजेल असं बोलणारा, लिहिणारा. ती ज्या प्रकारची लेखिका, त्यातला मी नव्हतो. ती गावांशी, घरांशी, घरातल्या वस्तूंशी बोलणारी. मला तो वेडपटपणा वाटायचा. तिला म्हणायचो, तुला सायकियाट्रिस्टकडे नेलं पाहिजे. पण नको. तोही वेडा होईल. म्हणायला लागेल, हा पेन आत्ताच म्हणत होता, पण तेवढ्यात हा स्टेथो मधेच बडबडला.
कमळी हसून बेजार. उत्सुकतेचे म्हणाली, मग पुढं? स्टेथोला काय म्हणायचं होतं?’
थट्टा करता करता मला त्याची कधी बाधा झाली कळलंच नाही. फिरायला जायचो, तिथली झाडं बोलू लागली. जंगलातल्या वाटा बोलू लागल्या. एवढंच काय, डोक्यावरचा पंखा, दारापासल्या चपला बोलू लागल्या. मग त्यातनं गोष्टी लिहू लागलो. काही वेळा तर असं झालं, लेख लिहायला घेतला. असह्य परिस्थितीतून ज्या व्यक्तीला पुढं जायला वाटच नाही, अशी अशक्य परिस्थिती. तिथं लगेच ही कमळीची फँटसी आली. तिनं एक काय, अनेक रस्ते दाखवले.
मी आनंद (नाडकर्णी)ला म्हणालो, हे सगळे माझ्याशी बोलतात. हे जेव्हा खरं वाटू लागेल, तेव्हा मी तुझ्याकडे ट्रिटमेंटला येईन. कमळीच्या रस्त्याने जाऊ लागलो, तसं मला या विविध वस्तूंना, जीवांना काही अस्तित्व आहे, असं जाणवू लागलं. आपल्यासाठी झिजणाऱ्या चपला. या जुन्या झाल्या की नव्या घ्यायच्या, या फेकून द्यायच्या, हाच माझा खाक्या. आता मला चपलांविषयी अगत्य वाटू लागलं. कृतज्ञतेने मन भरून आलं. कमळीच्या पागलपणात सामील झाल्याने हे मला मिळालेलं धन. थ्रो अवे संस्कृतीपासून दूर होतोच. पण आता याच पागलपणाने वेगळी मजा आणली, तसंच लालित्यही.
अगदी रास्ता पेठेतल्या घरात तिचा माझा एक करार ठरला होता. दोघांनी एकमेकांवर जिवंत असेतो लिहायचं नाही. मी आधी गेलो, तर तिनं लिहायचं, आणि ती आधी गेली, तर मी. तरी करार मोडून ती माझ्यावर कादंबरी लिहिणार होती. ते मागं पडलं. मग लेख लिहिणार होती.
आता सगळंच संपलं. मी अगदी जिवावर आल्यासारखं लिहायला घेतलं. दोन तीन पानं लिहिली. ते जमेना म्हणून पानं फेकून दिली. परत एकदा तस्संच झालं. मग मी कमळीला म्हणालो, तू आता गेली आहेस ना, मग मला ठल्याप्रमाणे लिहून का देत नाहीस?’
आता गडचिरोलीला आलो. निवांत घर, शांत वातावरण. सगळे आपापल्या कामावर गेलेले. तेव्हा कमळी पेनातून आली आणि पेपरावर उतरतच गेली. कमळे, मी करार पूर्ण केला आहे. आता मी जाईन, तेव्हा तू लिहायचं. कशावर लिहिशील? आभाळावर ढगांच्या पेनने? की समुद्रावर वाऱ्याच्या लेखणीने? की कुरणांवर झाडाच्या पेन्सलीने?
आणि म्हणू नकोस, की हा निरोप कळ्ळाच नाही!

(‘अंतर्नादच्या २०११च्या दिवाळी अंकातला लेख, अवचटांच्या परवानगीने इथे. फोटोही त्यांनीच काढलेला.)

2 comments:

  1. अवधूत...
    अरे, खूपच दिवसांनी अवचट मला पुन्हा आवडले यात...आणि 'शहाण्याचा नेहमी पराभवच का होतो ?' ...GREAT.
    Thanks...

    ReplyDelete
  2. खरच मनापासून लिहिलेलं छोटसं 'कमळा'चं पान ... कमळाच्या फुलासारखं...
    शांत- अशांत नदी किना-यावर डोलणार ...

    ReplyDelete